सांगली : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ७९ लाख ८ हजार ९०६ टन उसाचे गाळप करून ९३ लाख ७ हजार ३१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १५ साखर कारखान्यांपैकी १३ साखर कारखान्यांची धुरडी बंद झाली असून, सोनहिरा, उदगिरी कारखान्यांचे गाळप चार दिवसांत पूर्ण होईल. राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने उच्चांकी १२.७० टक्के उतारा तर, साखराळे युनिटने उच्चांकी गाळप केले आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाला. सुरुवातीच्या टप्प्यात गाळपाला गती नव्हती. त्यामुळे हंगाम धिम्या गतीने सुरू होता. यंदा जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी सुमारे ३० टक्के मजुरांची कमतरता होती. त्याचे कारण म्हणजे हंगाम सुरू असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भाव झाला. त्यामुळे त्यांचा त्रास मजुरांना झाला होता. त्यातच मराठावाडा, विदर्भात चांगला पाऊस झाल्याने मजुरांनी आपली शेती पिकविण्यासाठी पुढाकार घेतला. या दोन्ही कारणामुळे मजूर आले नाहीत. त्यामुळे यंदा मजूर टंचाईमुळे हंगाम एप्रिल मध्यापर्यंत सुरू राहील, अशी चर्चा सुरु होती.
यंदाच्या हंगामात पंधरा कारखान्यांचे पाच महिने गळीत हंगाम चालू होते. दत्त इंडिया, राजारामबापूचे चार युनिट, विश्वासराव नाईक, यशवंत शुगर, तासगाव, दालमिया, सदगुरू श्री श्री या कारखान्यांनी ऊस संपल्याने गळीत बंद केले आहे. राजारामबापू कारंदवाडी युनिटने ३ लाख ८३ हजार ६५३ टन उसाचे गाळप करून ४ लाख ८८ हजार ००० इतके साखरेचे उत्पादन घेतले असून, १२.७० टक्के साखर उतारा मिळाला आहे.
पंधरा कारखान्यात राजारामबापूच्या कारंदवाडी युनिटचा उच्चांकी साखर उतारा आहे. गाळप, साखर उताऱ्यात सोनहिरा कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारखान्यांचा साखर उतारा ११.८ टक्के राहिला आहे. साखर कारखान्यांनी गाळपाचे कोटेकोर नियोजन करीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकिकरणाचा वापर केला. त्यामुळे हंगाम लवकर आटोपला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.