रत्नागिरी : अचानक लागलेल्या वणव्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी परिसरातील आंबा, काजूची एक हजार झाडे होरपळली आहेत. यामध्ये चार शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले; मात्र तोपर्यंत २५ एकरचा परिसर भस्मसात झाला होता. चाफे, निवेंडी-धनगरवाडी, कळझोंडी या परिसरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वणवा लागला. वारा आणि वाळलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरत गेली. आंबा, काजू कलमांच्या बागा होरपळत होत्या. बागायतदार आणि स्थानिक ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र वणवा पसरत गेल्यामुळे तो नियंत्रणाच्या बाहेर गेला. या आगीत आंबा-काजू कलमे होरपळताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सुमारे पाच तास हे आगीचे तांडव सुरू होते. अखेर चार वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात सर्वांना यश आले. यामध्ये सुमारे ६१० आंब्यांची कलमे, तर २८० काजू कलमे होरपळून गेली आहेत. ऐन आंबा हंगामात बागायतदारांवर मोठा संकट कोसळले आहे. निवेंडीतील भूपेंद्र महादेव भोजे यांची १५० आंबा कलमे १०० काजू, पंप, पाईप वायरिंग जाळून खाक झाले. बाबाजी रामचंद्र कोकरे यांची ७० कलमे, ८० काजू, भगवान मांब्या कोकरे यांची ८९ कलमे १०० काजूची तर भालचंद्र भिकाजी नलावडे यांची ३०० कलमे आणि पंप, वायरिंग तर लक्ष्मण येडगे यांचा पंप आणि वायरिंग जळून खाक झाली. वणव्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालगुंड पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, कृषी विभागातर्फे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
प्रतिक्रिया अनेक वर्षे सांभाळलेली आंबा, काजू कलमे डोळ्या देखत होरपळत होती. पण आम्हाला काहीच करता येत नव्हते. ही मनाला वेदना देणारी घटना आहे. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने याची दखल घेऊन भरपाई द्यावी. -बाबाजी कोकरे, आंबा बागायतदार. निवेंडी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.