हिंगोली : पूर्णा नदीवरील सिध्देश्वर धरणाच्या कालव्याव्दारे उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तन सोडण्यात आले. परंतु, कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने उपाययोजना करुन शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मागणी आहे.
पूर्णा नदीवरील येलदरी धरण अनेक वर्षानंतर गतवर्षीच्या पावसाळ्यात भरले. त्याखालील सिध्देश्वर धरणही भरले होते. सिध्देश्वर धरणातून सिंचनासाठी कालवा काढण्यात आला. त्याचा लाभ हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतो. यंदा दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.
कालव्याच्या आवर्तनाची खात्री झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात भूईमूग, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड केली. उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. सध्या या दोन्ही धरणात अनुक्रमे ६९.१७ टक्के आणि ४४.६५ टक्के पाणीसाठा आहे.
सिध्देश्वर कालव्याव्दारे उन्हाळी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले. परंतु, या कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना सुरुवातीपासून पुरेशा प्रमाणात सिंचनासाठी पाणी मिळत नाही. वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके उन्हात होरपळून गेली. त्यामुळे या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी जलसंपदा विभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.