द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा मारण्याची वेळ

मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष पीकविम्याची देय रक्कम अद्यापही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
Time to cycle for grape insurance refunds
Time to cycle for grape insurance refunds

नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष पीकविम्याची देय रक्कम अद्यापही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र तरीही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे चकरा मारण्याची वेळ आली आहे. 

मागील हंगाम ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ करिता लागू असलेली द्राक्ष पीकविमा प्रमाणे नाशिक विभागातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविम्याचे संरक्षण घेतले होते. त्यांना अवेळी झालेल्या पावसाचे नुकसानभरपाई म्हणून पीकविमा नियमावलीप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत जमा होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही विमाधारक शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघाने वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र अद्यापही विमा खात्यात वर्ग झाला नसल्याची स्थिती आहे.  

महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने यापूर्वी कृषिमंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र अद्याप त्यावर कुठलीही हालचाल झालेली दिसत नाही. हातात भांडवल नसताना पदरमोड करून शेतकऱ्यांनी फळपीक  विमा योजनेत सहभाग घेतला; मात्र पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवी निमसे, सचिव बाळासाहेब गडाख, माजी सचिव अरुण मोरे यांनी नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे. तर पुढील काही दिवसांत रक्कम खात्यावर वर्ग होईल, असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्‍वस्त केले.

विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर सरकारने आम्हाला प्रीमीयम सबसिडीची रक्कम अद्याप वर्ग न केल्यामुळे आम्ही भरपाई देऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तर राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या विमा रकमेच्या पोटी पैसे कृषी आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी कधी पडेल हे मिळाल्यावरच खरे, अशी परिस्थिती आहे.

 परतावा देण्यासाठी आग्रह का नाही?  पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभाग आवाहन करतो. त्यानुसार शेतकरी हजारो रुपये पदरमोड करून भरतो. नुकसान झाल्यानंतर काहीतरी पदरी पडेल ही अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात नुकसान झाल्यानंतर त्याचा परतावा वेळेवर तर कधी मिळतच नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे फक्त पैसे भरून घेण्यासाठी आवाहन करतात तसे परतावा देण्यासाठी कृषी विभागाचा आग्रह का नाही, असा सवाल पीकविम्याच्या परताव्याच्या प्रतीक्षेत असलेले द्राक्ष उत्पादक करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com