भरपाईसाठी शेतकऱ्यांवर पुन्हा वाट पाहण्याची वेळ

भरपाईसाठी शेतकऱ्यांवर पुन्हा वाट पाहण्याची वेळ
भरपाईसाठी शेतकऱ्यांवर पुन्हा वाट पाहण्याची वेळ

अमरावती  ः मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी नुकसान भरपाईपोटी तिसऱ्या टप्प्यात ४५.९८ कोटींची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली असताना केवळ २७.८१ कोटींचाच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर मदतीसाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे.  गेल्या वर्षी २०१९ मध्ये १७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसाचा फटका काढणीस आलेल्या सोयाबीनला बसला. काही भागात सोयाबीन सडले, भिजलेल्या शेंगामध्ये बीजांकुर निघाले, सोयाबीनचे ८० टक्‍के क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बी निघाले. कापसाची प्रतही खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहाराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानीसाठी शासनाचे प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्‍टरी आठ हजार व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७२.४० कोटी, दुसऱ्या टप्प्यात १५८ कोटींची मदत मिळाली. तिसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी ९८ लाख ९२ हजार ६६५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. शासनाकडून मात्र तिसऱ्या टप्प्यात केवळ २७ कोटी ८१ लाख ४३ हजार रुपयांचीच उपलब्धता करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा मदतीसाठी चौथ्या टप्प्यातील निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, मॉन्सूनोत्तर पावसामुळे ३ लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांचे २ लाख १२ हजार ३२९ हेक्‍टरवरील सोयाबीन, १ लाख ३५ हजार ४७२ हेक्‍टरवरील कपाशी, ११ हजार ३६ हेक्‍टरवरील ज्वारी, २ हजार ७०६ हेक्‍टरवरील तूर व इतर पिकांचे नुकसान झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com