नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५० टक्क्यांपर्यंत नुकसान

टोमॅटोच्या फळांचा लिंबासारखा आकार होत असताना, फळांवर डाग पडायला सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागवडी झाल्या. मात्र आता शेवटचे खुडे होणार नसल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे चालू वर्षी मोठे नुकसान झाले आहे. - प्रफुल पवार, टोमॅटो उत्पादक,वणी खुर्द, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
tomato crop damage
tomato crop damage

नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५३ हजार ४०० हेक्टरवरील भाजीपाला पिके पावसामुळे बाधित झाली आहेत. यात टोमॅटोचाही समावेश असून, पिकाचे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे .

ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीत जिल्ह्यात टोमॅटो लागवड करण्यात आली. साधारणतः डिसेंबरपर्यंत टोमॅटो काढणी हंगाम चालतो. मात्र अनेक ठिकाणी टोमॅटो पीक पावसाच्या तडाख्यात सापडले. त्यामुळे पुनर्लागवडी कराव्या लागल्या. सततच्या पावसामुळे भुरी, लवकर व उशिरा येणारा करपा या रोगांसह नाग अळीचा प्रादुर्भाव या पिकावर झाला.

त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील पूर्व व पश्चिम भाग, चांदवड तालुक्यातील पश्चिम भाग, निफाडचा पूर्व भाग व नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. काही ठिकाणी अनेक शेतकरी दुहेरी फुटवा घेऊन टोमॅटो उत्पादन घेतात. मात्र सकाळी दव व धुके वाढत असल्याने या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. 

तापमानातील बदलामुळे झाडे तणावात आहेत. करप्यामुळे पाने खराब होऊन गळून पडली. त्यामुळे  फुलकळ्यांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली. फळे पण खराब होत असून डाग पडले आहेत. फळांची फुगवण होत नाही. पावसामुळे नवी फळे बाधित झाल्या आहेत. फुलगळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जिल्ह्यात टोमॅटोचे सर्वसाधारण एकरी १२०० क्रेट उत्पादन असते. मात्र प्रतिकूल हवामानाच्या फटक्यामुळे सध्या हे उत्पादन ५०० क्रेटपेक्षा कमी येत आहे. सध्या निघत असलेल्या फुलकळ्या सततच्या दव व धुक्यामुळे खराब होत आहेत. त्यामुळे उत्पादन हाती येण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहेत. अजून तरी किमान एक महिना टोमॅटो तोडे चालणे अपेक्षित होते, मात्र रोगांमुळे संपूर्ण पीक बाधित होत आहे. परिणामी, टोमॅटो उत्पादक हवालदिल झाले आहेत.  

प्रतिक्रिया टोमॅटो पिकासाठी भरपूर खर्च केला, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा मातीमोल झाली. पावसामुळे टोमॅटो पीक खराब झाले आहे. तडे जाऊन ५० टक्के माल खराब झाला आहे. - राजू निफाडे, शिरवाडे वणी, ता. निफाड, जि. नाशिक. 

सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहेत. काही भागात किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे. कीड,रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून तज्ज्ञांच्या सल्यानेच उपाययोजना कराव्यात.  - तुषार उगले, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्र विभाग, के के वाघ कृषि महाविद्यालय,नाशिक   असे आहे टोमॅटोचे नुकसान 

  • सततच्या पावसामुळे मुळ्याची सड होऊन झाडे बाधित.
  • उत्पादनात ५० टक्के घट शक्य.
  • सततच्या पावसामुळे फळांना तडे.
  • फुलकळी गळ, फळांना काळे डाग.
  • करपा अधिक असल्याने पानांची गळ.
  • एकरी उत्पादन खर्च सुमारे २५ हजारांनी वाढला.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com