नागपूरात व्यापाऱ्यांची थेट शेतमाल विक्रीत घुसखोरी 

लक्ष्मीनगर, धरमपेठ, बजाज नगर, उत्कर्ष नगर या भागात आम्ही थेट भाजीपाला विक्री करतो. लॉकडाऊननंतरही ग्राहकांचा विश्‍वास कायम राहावा याकरिता चांगल्या प्रतीचा भाजीपाला वाजवी दरात पुरविण्याची बांधीलकी जपली आहे. याउलट व्यापारी मात्र शेतकऱ्यांकडून कमी दराने घेऊन त्यात दलाली व इतर खर्चाचा समावेश करुन जादा दराने विक्री करीत आहेत. - कमलेश भोयर, कन्हान ॲग्रो व्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी, कन्हान, नागपूर
vegetable
vegetable

नागपूर ः कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत नागपूर जिल्ह्यात सुरुवातीला ५० शेतकरी गटांना थेट विक्रीची मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून घुसखोरी झाल्याने हळूहळू शेतकरी संख्या कमी होत गेली. आता केवळ २५ शेतकरी गटांकडूनच शहरात भाजीपाला विक्री केली जात आहे. दुसरीकडे काही भागातील शेतकरी व्यापाऱ्यांना भाजीपाल्याचा पुरवठा करीत आहेत. व्यापारी मात्र कमी दरात शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेत त्याची जादा दराने विक्री करीत आहेत.  कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात ग्राहकांची भाजीपाला व इतर जिन्नस खरेदीत लुट होऊ नये याकरीता खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर जिल्हयात कृषी विभागाच्या माध्यमातून मार्च महिन्यातच ५० शेतकरी गटांना भाजीपाला विक्रीसाठी परवाने देण्यात आले. ५० शेतकरी गटांकडून परवाने घेण्यात आल्यानंतर काही दिवस ४२ गटांकडून भाजीपाला विक्री झाली. त्यानंतर ही संख्या कमी होत ३४ शेतकरी गट आणि आता २४ ते २५ शेतकरी गटांपर्यंत मर्यादीत झाली आहे.  उर्वरित ठिकाणी १४५ पेक्षा अधिक व्यापारी, अडते यांचेच प्राबल्या भाजीबाजारात दिसून येत आहे. कळमणा बाजार समिती तसेच कॉटन मार्केट परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने कॉटन मार्केट परिसरात भाजी व्यवहारावर बंदी लादण्यात आली. त्यानंतर आठ ठिकाणी हा बाजार विभागण्यात आला. कळमणा बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यवहाराकरीता आठवड्यातील तीन दिवस निश्‍चीत करण्यात आले आहेत. या ठिकाणी गर्दी नियंत्रण करताना बाजार समिती प्रशासनाच्या नाकीनऊ येत असल्याने ते त्रासले आहेत त्यातच पोलिसांकडून खबरदारी म्हणून ड्रोनव्दारे या परिसरात चित्रीकरण केले जाते. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारल्या जाण्याची भिती देखील कळमणा बाजार समिती प्रशासनावर आहे.  शहरात ठिकठिकाणी भरणाऱ्या भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांकडून घेतलेला कमी किंमतीचा माल ग्राहकांना मात्र अव्वाच्या सव्वा दरात विकल्या जात आहे. शेतकऱ्यांची व ग्राहकांची या माध्यमातून पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे.  शेतकऱ्यांचे विक्री दर आणि ग्राहकांचे खरेदी दर (प्रतिकिलो-रुपये) 

शेतमाल शेतकरी ग्राहक
पालक २७ ८० 
टोमॅटो ३० 
भेंडी २० ६५ 
शेवगा ३० ६० 
मिरची २८ ४५ ते ५० 
कोथींबीर ३० ६० 
वांगी ६ ते ७ २० 
कलींगड १० २० 
गवार २० ते २५ ५५ ते ६०
कांदा ७ ते ९ ३० 
कोबी २५ ४५ ते ५० 

प्रतिक्रिया बाजारात टोमॅटो ३० ते ३५ रुपये किलो विकल्या जात असताना आम्हाला मात्र व्यापारी अवघ्या २ रुपये किलोने मागत आहेत. मोठ्या क्षेत्रावर टोमॅटो लावला आहे. त्यामुळे थेट विक्री करणे शक्‍य होत नाही. तोडणी आणि त्यांनतर विक्री ही कामे शक्‍य होणार नाही. परिणामी आता टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे.  - अशोक चापले, कन्हान, नागपूर   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com