पुणे, मुंबईत व्यापाऱ्यांकडून उद्यापासून बाजार समित्यांत व्यवहार बंद

राज्यातील बाजार समित्या सुरूच राहणार असल्या; तरी पुणे, मुंबईसह काही बाजार समित्यांतील व्यापारी आणि कामगार संघटनांनी व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
pune market committee
pune market committee

पुणे: राज्यातील बाजार समित्या सुरूच राहणार असल्या; तरी पुणे, मुंबईसह काही बाजार समित्यांतील व्यापारी आणि कामगार संघटनांनी व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जे शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये आणतील त्यांना शेतीमाल विक्रीच्या सुविधा बाजार समित्यांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यभरात सरकारकडून उपाय योजना करण्यात येत आहे. मात्र, बाजार समित्यांत होणार गर्दी लक्षात घेऊन पुणे, मुंबईतील व्यापारी आणि कामगार संघटनांना व्यवहार न करण्याचा आणि काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भाजीपाला, अन्नधान्य अत्यावश्‍यक सेवेत मोडत असल्याने आणि नागरिकांची गैरसोय होऊन नये म्हणून बाजार समित्या सुरूच ठेवण्याचा निर्णय पणन संचालकांनी घेतला आहे.  दरम्यान, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूचा संसर्ग आणि फैलाव रोखण्यासाठी सर्व बाजार घटकांनी शुक्रवार (ता. २०) ते रविवार (२२) पर्यंत बाजार आवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी (ता. २३) बाजार सुरू झाल्यानंतर बाजारात येणाऱ्या विविध घटकांची संख्या सुमारे २५ हजार एवढी असते. यामुळे सर्वच घटक कोरोना विषाणूच्या संसर्गाला घाबरलेला आहे. यामुळे अडते असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व अडत्यांनी बंद ठेवण्याची भूमिका घेतली. त्यानुसार बुधवार (ता. २५) पासून मंगळवार (ता. ३१) बंद ठेवण्यात येणार आहे.’’कामगार संघटनेचे सरचिटणीस संतोष नांगरे म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूबाबत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. कामगारांचे कुटुंबीय त्यांना कामावर पाठवत नाहीत. त्यामुळे सर्व घटकांचा विचार करता आम्ही ३१ मार्चपर्यंत कामावर न येण्याचा निर्णय घेतला आहे.’’ दरम्यान, आणीबाणीच्या काळात शासन आदेशाचे उल्लंघन करत बाजार समित्या बंद ठेवणाऱ्या अडत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला. मार्चअखेरपर्यंत कांदा लिलाव राहणार बंद नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या या अत्यावश्यक अन्नपुरवठा साखळीमध्ये येत असल्याने त्यांचे कामकाज सुरू राहील, अशा सूचना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या. मात्र, जिल्ह्यातील काही बाजार समित्यांनी कामकाज मंगळवार (ता. २४) पासून मार्चअखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी २५ मार्चनंतर व्यावहारिक कारणासाठी काजकाज मार्चअखेर बंद असते. मात्र, चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव, जमावबंदी आदेश, अमावास्या व गुढीपाडवा सुटीमुळे कामकाज दोन दिवस अगोदर बंद झाले आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार (ता. २४)पासून मार्चअखेर कांदा लिलाव बंद राहणार आहे, तर भाजीपाला लिलाव सुरू असतील, अशी माहिती संपर्क साधला असता बाजार समितीचे सचिव संजय पाटील यांनी दिली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज अमावास्या व गुढीपाडव्यामुळे मंगळवारी (ता. २४) व बुधवार (ता. २५) बंद असणार आहे, अशी माहिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. येथे सध्या व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर काम करण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे, तर दुसरीकडे जमावबंदी असूनही गर्दी होत असल्याने कामकाजात अडथळे येत आहेत, त्यामुळे गुरुवार (ता. २६) पासून बंद करण्याबाबत येथे स्पष्ट करण्यात आलेले नाही, तर नाशिक बाजार समितीत भाजीपाला व फळ लिलाव सुरू असतील अशी माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली.  नगरमध्ये एकदिवसाआड भाजीपाला लिलाव नगर : बाजार समित्या सुरू राहण्याबाबत बाजार समिती प्रशासन आग्रही असले तरी व्यापारी, हमाल, मापाडी यांनीच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काम करण्याला नकार दिल्यामुळे नगरसह जिल्हाभरातील बहुतांशी बाजार समितीत सोमवारी (ता. २३) भुसार व कांद्याचे लिलाव बंद झाले आहेत. भाजीपाल्याची आवक कमी झाली असली, तरी त्याचे लिलाव एक दिवसआड सुरू राहणार असल्याचे नगर बाजार समितीमधून सांगण्यात आले. किमान भाजीपाल्याचे तरल लिलाव सुरू राहावेत, अशी बाजार समितीची भूमिका आहे; मात्र दररोज लिलाव करण्यास नकार दिल्यामुळे किमान एक दिवसाआड भाजीपाल्याचे लिलावनगरमध्ये सुरू राहतील असे प्रयत्न बाजार समितीने सुरू ठेवले आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात तीन दिवस बंद अकोला : जिल्ह्यातील बाजार समित्या प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन नुसार तीन दिवस बंद आहेत. व्यापारी, अडत्यांनी बाजार बंद ठेवण्याबाबत निवेदन दिले असून याबाबत बाजार समिती प्रशासन परिस्थिती पाहून व शासनाच्या निर्देशानुसार पुढील भूमिका ठरविणार आहे.  रत्नागिरीत भाजीपाला आवक सुरू राहणार रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरीतील बाजार समितीनेही जिल्ह्यातील सहा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे बाजार समिती सुरूच... पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बुधवार (ता. २५) पासून बंद करण्याचे अडते आणि विविध कामगार संघटनांनी जाहीर केले आहे. मात्र, प्रशासक बी. जे. देशमुख यांनी, कोरोनाच्या लढाईच्या आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना मुबलक भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे बाजार समित्यांचे कर्तव्य आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य समजून सर्व बाजार घटकांनी बाजार सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी मी उद्या (मंगळवारी) सर्व घटकांची बैठक घेऊन त्यांना कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आवाहन करणार आहे, असे सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com