सोलापुरात फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी कॉलेजसाठी प्रयत्न करू

 सोलापुरातील विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या मुळेगाव प्रक्षेत्रावर बुधवारी (ता.10) आयोजित शेतकरी मेळाव्यात कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. विनय सुपे, डॉ. विजय अमृतसागर.
सोलापुरातील विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या मुळेगाव प्रक्षेत्रावर बुधवारी (ता.10) आयोजित शेतकरी मेळाव्यात कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. विनय सुपे, डॉ. विजय अमृतसागर.

सोलापूर : "सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू फळपीके आणि एकूणच डाळिंबाच्या वाढत्या उत्पादनाचा विचार करता कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जिल्ह्यात फूड प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी कॉलेजसाठी प्रयत्न करू,'' असे आश्‍वासन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी बुधवारी (ता.१०) येथे आश्‍वासन दिले.

कृषि विद्यापीठाच्या येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात डॉ. विश्‍वनाथा बोलत होते. कृषी विभागासह दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाने या मेळाव्यासाठी साह्य केले. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, सीताफळ संघाचे नवनाथ कसपटे, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय उबाळे, सहयोगी संचालक डॉ. विजय अमृतसागर, डॉ. विश्‍वनाथ शिंदे, एस. पी. काळे, उदय नान्नजकर आदी उपस्थित होते.

डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, "सोलापूरच्या या केंद्राला मोठा इतिहास आहे. कोरडवाहू पिकांसाठी काम करताना नवनवीन तंत्रज्ञानाच्या शिफारशी, विविध वाणे या केंद्राने महाराष्ट्राला दिली. कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यात एक महत्त्वाचं स्थान या केंद्राला आहे. सोलापूरला दर तीन-चार वर्षांनी दुष्काळाला तोंड द्यावे लागते, याही परिस्थितीत इथल्या शेतकऱ्यांचे आत्मबल खूपच मोठे आहे.

अलीकडच्या काळात डाळिंबाने तर त्यामध्ये इतिहास केला आहे. आज सोलापूरचे डाळिंब असे जीआय मानांकन मिळाल्याने त्याला महत्त्व आहे. पण तरीही नवनवीन तंत्राचा वापर करताना एकपीक पद्धतीऐवजी एकात्मिक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे.''

डॉ. गडाख म्हणाले, "ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूरची ओळख आजही कायम आहे. पण बदलत्या परिस्थितीनुसार इथल्या शेतकऱ्यांनी अंगीकारलेले बदलही तितकेच कौतुकास्पद आहेत. डॉ. कोकाटे म्हणाले, "दुष्काळी जिल्हा असूनही शेतीत केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. आज दूध, डाळिंब, केळी व अन्य शेती उत्पादनातून जिल्ह्याची उलाढाल १० ते १२ हजार कोटींपर्यंत पोचली आहे. अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्याचे अर्थकारण शेतीने बदलले आहे. प्रतिकूल परिस्थितीतील शेतकऱ्यांचा संघर्ष कौतुकास्पद आहे.''

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहयोगी संचालक डॉ. अमृतसागर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू सांगितला. डॉ. जे. डी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी आभार मानले. शिवारफेरी, प्रदर्शन आणि तांत्रिक चर्चासत्रे शेतकरी मेळाव्यासह तीन दिवसांत विविध परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. डाळिंब, ऊस लागवड तंत्रज्ञानासह जैविक खत निर्मिती, कोरडवाहू पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता, ज्वारी लागवड व उपपदार्थ निर्मिती, एकात्मिक शेतीपद्धती यासारख्या विविध विषयावर तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय संशोधन केंद्राच्या मुळेगाव प्रक्षेत्रावर शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक कंपन्यांचे कृषी विषयक साहित्याचे प्रदर्शनही या ठिकाणी भरवण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com