सध्याचे सरकार ‘गाजर’ दाखवणारे

वरवट बकाल (ता. संग्रामपूर) ः बाजार समितीच्या प्रांगणात सोमवारी (ता. १३) झालेल्या कापूस-सोयाबीन परिषदेत बोलताना रविकांत तुपकर.
वरवट बकाल (ता. संग्रामपूर) ः बाजार समितीच्या प्रांगणात सोमवारी (ता. १३) झालेल्या कापूस-सोयाबीन परिषदेत बोलताना रविकांत तुपकर.

अकोला ः सरकारने दिलेली कर्जमाफी नसून ही शेतकऱ्यांची थट्टा अाहे. अाज कुठल्याच शेतमालाला भाव नाही. हे सरकार शेतकऱ्यांना गाजर दाखविणारे अाहे. शासनाने सोयाबीनला सहा हजार अाणि कापसाला किमान सात हजार रुपये क्विंटलला भाव दिला पाहिजे. हा भाव न दिल्यास स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या सोबतीने लढा उभारेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघनटेचे नेते तथा महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.  वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १३) अायोजित केलेल्या कापूस-सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, वाशीम जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, युवा अाघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह इतर उपस्थित होते. या वेळी तुपकर पुढे म्हणाले, की सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना गाजर दाखविणारे अाहे. निवडणुकीपूर्वी यांनी दिलेली अाश्वासनेच पाळली नाहीत, तर इतर बाबी दूर राहल्या. शेतमालाला भाव देऊ, स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशी लागू करू, असे निवडणूक प्रचारात सांगणाऱ्या या सरकारमधील नेत्यांना सर्वच गोष्टींचा विसर पडला. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत अाहे. असे असताना तुम्ही सुलतानी पद्धतीने त्याचे कृषिपंपांचे कनेक्शन तोडायला निघालात. कर्जमाफीची घोषणा करून बराच काळ लोटला. किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला. शेतकऱ्याला भाव मिळवताना, कर्जमाफीचा लाभ घेताना, अाता शेतमाला विकताना सर्वत्रच त्रास दिला जात अाहे. अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्तेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद अाहे. या कार्यकर्त्यांना कुणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे सांगत तुपकर यांनी राज्यात गाजत असलेला संग्रामपूर येथील तूर खरेदी घोटाळा स्वाभिमानी संघटना व शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच उघड झाल्याचा दावा केला.  शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास मंत्र्यांना विदर्भ, मराठवाड्यात फिरून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशांत डिक्कर यांनी संग्रामपूर तूर घोटाळा कसा उघडकीस अाणला, याची माहिती देत संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत राहील, असे सांगितले. या वेळी बाजारा समितीच्या प्रांगणात झालेल्या सभेला हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com