‘वान’चा पाणी प्रश्न पेटण्याच्या वळणावर

‘वान’चे पाणी पेटण्याच्या वळणावर
‘वान’चे पाणी पेटण्याच्या वळणावर

अकोला ः जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातील पाणी अकोला महानगराला अमृत योजनेअंतर्गत राखीव ठेवण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर याविरुद्ध ग्रामीण भागात तीव्र संताप वाढू लागला आहे. ठिकठिकाणी विरोध होत असून, दोन दिवसांपूर्वी तेल्हारा तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या स्थानिक आमदारांवर शेतकऱ्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केल्याची घटना समोर आली.

तेल्हारा तालुक्यात वारी हनुमान येथे वान प्रकल्प असून यातील पाणी २४ दलघमी पाणी अकोला महानगरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याबाबत शासन मंजुरीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. हे पाणी आरक्षण वाचल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आक्रोश वाढत आहे. हा प्रकल्प सिंचनाच्या उद्देशाने निर्माण झालेला असून, आतापर्यंत विविध योजनांसाठी पाणी नेण्यात आले. आता अकोल्याला तब्बल २४ दलघमी पाणी आरक्षित केल्यास सिंचनालाही पाणी मिळणार नसल्याची भावना तयार झाली आहे. वान प्रकल्पाची ८३.४७ दलघमी क्षमता आहे. गेल्या अनेक वर्षांत या प्रकल्पातील गाळ काढलेला नसल्याने क्षमता कमी झाली. 

सोबतच या प्रकल्पावरून अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील असंख्य गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी योजना सुरू झालेल्या आहेत, असे असताना आता पुन्हा अकोला महानगरासाठी २४ दलघमी पाण्याचा साठा आरक्षित करण्यास शासनाने मंजुरी दिल्याने रोष वाढला आहे. यंदा या भागातील इतर प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र मध्य प्रदेश तसेच सातपुड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वान प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. येत्या रब्बीत तसेच उन्हाळी पिकांसाठी पाणी मिळेल अशी शक्यता वाटू लागली. परंतु अकोल्याला २४ दलघमी पाणी दिल्यास सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण होईल, असा समज निर्माण झाला आहे. यामुळे आता गावागावांत विरोधाची धार वाढते आहे.

...तर ५७.८७ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठीच सद्यःस्थितीत वान प्रकल्पातून ७ पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवण्यात येते. त्यामध्ये आकोट शहर पाणीपुरवठ्यासाठी ८.६६ दलघमी, तेल्हारा शहर पाणीपुरवठा ३.१६ दलघमी, ८४ खेडी पाणीपुरवठा ४.२३ दलघमी, शेगाव शहर पाणीपुरवठा ५.६२ दलघमी, खारपाण पट्ट्यातील १४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस ८.४५द लघमी, १५९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ३.७५ दलघमी पाणी दिले जाते. आता त्यामध्ये आणखी २४ दलघमी आरक्षित केले आहे. यामुळे प्रकल्पात ५७.८७ दलघमी साठा पिण्यासाठी राखीव झाला आहे. सिंचनासाठी नाममात्र पाणी शिल्लक राहत आहे. त्यातही बाष्पीभवनामुळे पाणी कमी होते.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com