वीस हजार क्विंटल शेतीमालाचा दररोज लॉकडाऊनमध्ये पुरवठा : एकनाथ डवले

आजच्या घडीला दररोज सरासरी वीस हजार क्विंटल शेतीमालाचा पुरवठा होत आहे, ही मोठी बाब आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.
वीस हजार क्विंटल शेतीमालाचा दररोज लॉकडाऊनमध्ये पुरवठा : एकनाथ डवले
वीस हजार क्विंटल शेतीमालाचा दररोज लॉकडाऊनमध्ये पुरवठा : एकनाथ डवले

मुंबई ः लॉकडाऊनच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या अनुषंगाने कृषी खात्याने मोठी मोहीम हाती घेतली आहे. २७ मार्चपासून विभागाने याची सुरुवात केली. राज्यभरातील सुमारे तीन हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतीमाल पुरवठा सुरु आहे. लहान-मोठ्या शहरांना भाजीपाला आणि फळे पुरवण्याचे काम केले जात आहे. आजच्या घडीला दररोज सरासरी वीस हजार क्विंटल शेतीमालाचा पुरवठा होत आहे, ही मोठी बाब आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.

श्री. डवले यासंदर्भात ‘ॲग्रोवन'शी बोलताना म्हणाले, ‘‘विशेषतः मोठ्या शहरांच्या खालोखाल असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरांमध्येही थेट भाजीपाला पुरवठा मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधीच्या काळात मोठ्या शहरांमध्ये शेतकरी ते ग्राहक योजनेला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये या मोहिमेला अपेक्षित यश मिळत नव्हते. लॉकडाऊनच्या काळात ही एक नवी संधी तयार होत असल्याचे दिसून येत आहे. एकंदर या मोहिमेच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शहरांमधील गृहनिर्माण हौसिंग सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये शेतीमाल पुरवठ्याची एक नवी साखळी तयार होत आहे. यातूनच भविष्यात शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला पुरवठा संकल्पनेला व्यापक स्वरुप प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. किंबहुना येत्या काळात ही साखळी अजून सक्षम होईल.''

खरीप हंगामाच्या तयारीबाबत बोलताना श्री. डवले म्हणाले, ‘‘खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने तयारी सुरु केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खरीपाचे नियोजन सुरु आहे. स्वतः कृषीमंत्री दादा भुसे यांनी सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात पत्रं पाठवली आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंत सर्व जिल्हा स्तरावर खरीपाच्या बैठकांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या खरीपाचे नियोजन केले जाईल. त्यानंतर लॉकडाऊनचा अंदाज घेऊन राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक आयोजित केली जाईल. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष फिल्डवर काम सुरु झाले आहे. विभागाने बि-बियाणे, खते आदी निविष्ठांचे नियोजन सुरु केले आहे. हंगामासाठी राज्याला आवश्यक निविष्ठांचा साठा उपलब्ध करण्यासाठी बि-बियाणे आणि खत कंपन्यांकडे मागणी नोंदवण्याचे कामही सुरु आहे. येत्या आठवड्यात कृषी आयुक्तालयामार्फत निविष्ठा कंपन्यांकडे राज्याची मागणी नोंदवण्याचे कामही पूर्ण होईल.'' 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com