शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून जनावरांच्या छावण्या

शासन उपाययोजना करेल तेव्हा करेल, शेतकऱ्यांची जनावरे तर जगली पाहिजे. या भागातील दुष्काळाची तीव्रता पाहता लोकांची गरज म्हणून आम्ही लोकसहभागातून छावणी सुरू करत आहोत. शासनाकडून मान्यता येईपर्यंत लोकांच्या सहभागातून छावणी सुरू राहील. - साईनाथ घोरपडे, वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर.
वैजू बाभूळगाव येथे चारा छावणीचे उदघाटन
वैजू बाभूळगाव येथे चारा छावणीचे उदघाटन

नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना जनावरे जगविण्यासाठी उपाययोजना होत नसल्याने आता पशुपालक आपापल्या परीने पर्याय शोधू लागले आहेत. पाथर्डी तालुक्‍यातील खोजेवाडी नंतर आता वैजु बाभुळगाव (ता. पाथर्डी) जवळ किसान सभेचे कार्यकर्ते साईनाथ घोरपडे यांच्या पुढाकाराने आणि शेवगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या आहेत. दानशुरांच्या मदतीने सुरू केलेल्या छावणीचे दोन दिवसांपूर्वी शेवगाव येथे खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते तर वैजुबाभुळगावात शनिवारी शेतकऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. 

नगरसह राज्याच्या अनेक भागांत यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपात नुकसान झाले. परतीचा पाऊसही आला नाही म्हणून रब्बीची पेरणी झाली नाही. नदी, नाले, तलाव, कोरडे असून पाणीपातळी वाढीला यंदा आजिबात मदत झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून एप्रिल-मे मध्ये कोरडे पडणारे जलस्रोत ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्येच कोरडे पडले आहेत. पाणी नसल्याने शेतीचा प्रश्‍न जटिल बनला आहे.

जनावरांना चारा, पाणी मिळेनासे झाले. अजून सात महिने कसे काढणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाची तीव्रता पाथर्डी तालुक्‍यात आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार तालुक्‍यातील चारा संपला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला, परंतु अजून कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. जनावरांच्या छावण्या सुरू करणार की दावणीला चारा देणार हे अजून स्पष्ट नाही. दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता असलेल्या पाथर्डी, शेवगाव तालुक्‍यांतील शेतकरी मात्र जनावरे जगवताना त्रस्त आहे. 

मात्र सरकार काहीच दखल घेत नसल्याने थकलेल्या शेतकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता स्वतःच पर्याय शोधायला सुरवात केली आहे. दोन महिन्यांपूर्वी पाथर्डी तालुक्‍यातील खोजेवाडी येथे लोकसहभागातून जनावरांची छावणी सुरू झाली. त्यानंतर आता वैजुबाभुळगाव (ता. पाथर्डी) येथे अखिल भारतीय किसान सभा आणि शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक ग्रामविकास मंडळाच्या पुढाकाराने साईनाथ घोरपडे यांनी छावणी सुरू केली आहे. शनिवारी शेतकरी भाऊसाहेब चव्हाण यांच्या हस्ते छावणीचे उद्‌घाटन झाले. साईनाथ घोरपडे, पांडूरंग टेमकर, अशोक टेमकर, बाजीराव वारे, अशोक पाटोळे  आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

शेवगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आता तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून अजून कोणत्याच हालचाली होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेऊन छावणी सुरू केली आहे. आता येथे जनावरे येऊ लागली आहेत, अशी माहिती शेवगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष  दत्ता फुंदे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com