उत्तर प्रदेशात आंदोलक शेतकऱ्यांना मोटारींनी चिरडले

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर दोन एसयूव्ही मोटारी गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना येथे रविवारी (ता.3)घडली. यात अनेक जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशात आंदोलक शेतकऱ्यांना मोटारींनी चिरडले
उत्तर प्रदेशात आंदोलक शेतकऱ्यांना मोटारींनी चिरडले

लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) ः कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर दोन एसयूव्ही मोटारी गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना येथे रविवारी (ता.3) घडली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना-भवानीपूर येथे दौऱ्यावर आले असताना, त्यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले. त्यानंतर ही घटना घडली.  स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी लखीमपूर खेरी येथे आले होते. त्यानंतर ते मिश्रा यांचे मूळ गाव भवानीपूर येथे जाणार होते. त्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच कृषी कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे शेतकरी ते उतरणार असलेल्या हेलिपॅडपाशी सकाळी आठ वाजताच पोहोचले. त्यांनी हेलिपॅडवर ठिय्या दिला व त्याचा ताबा घेतला.  त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता मोटारीने मिश्रा आणि मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली.  या घटनेत सहा शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते.  या घटनेनंतर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना पाहून मौर्य यांनी भवानीपूर गावातील दौरा रद्द केला. ज्या दोन गाड्या गर्दीत घुसल्या त्यांना थांबविताना एका महिला पोलिसासह दोन पोलिस जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. त्याचबरोबर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत हेही लखीमपूरकडे रवाना झाले आहेत. लखीमपूर खेरी येथे जाण्यासाठी निघालेले समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली.  दगडफेकीमुळे मोटारी उलटल्या राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारींनी चिरडल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर शेतकरी संतप्त झाले व त्यांनी मोटारी पेटवून दिल्या मोटारीतील लोकांना मारहाण केली. त्या मारहाणीत मोटारीतील चौघांचा मृत्यू झाला. यापैकी एका गाडीत अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेक असल्याचे बोलले जात होते. मात्र अभिषेक त्या वेळी गाडीत नव्हता असा खुलासा नंतर मिश्रा यांनी केला. तसेच काही जणांनी केलेल्या मारहाणीत भाजपचे तीन कार्यकर्ते आणि गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला, असेही मिश्रा यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले. गाड्यांचा ताफा तेथून जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आल्याने दोन मोटारींचे नियंत्रण सुटले व त्या उलटल्या. त्याखाली दोन शेतकरी मृत्युमुखी पडले, अशी माहितीही मिश्रा यांनी दिली. प्रतिक्रिया...

या घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. - अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख

शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याची क्रूर पद्धत. मी लखीमपूर खेरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com