शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद 

सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक थ्रीफेज रोहित्राचा वीजपुरवठा गुरुवार (ता. १८)पासून बंद केला आहे. सुमारे तीनशे कोटींपेक्षा अधिक रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ही धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
Two thousand Rohitras closed in Shirur
Two thousand Rohitras closed in Shirur

पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक थ्रीफेज रोहित्राचा वीजपुरवठा गुरुवार (ता. १८)पासून बंद केला आहे. सुमारे तीनशे कोटींपेक्षा अधिक रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ही धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

महावितरणच्या या कारवाईचा शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, सादलगाव, आलेगाव पागा, आंधळगाव, तांदळी, बाभूळसर, इनामगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. कारण भीमा, मुळा-मुठा नदी पात्रात पाणी असूनही विजेअभावी ते देता येत नसल्यामुळे पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

दर तीन महिन्याला शेतकऱ्यांना वेठीस धरून वीजबिल वसुलीसाठी ट्रान्स्फार्मरचा वीजपुरवठा बंद केला जात आहे. वास्तविक वीज कंपनी आठ तास वीजपुरवठा करत असताना २४ तासांचे अंदाजे वीजबिल देत आहे. सद्यःस्थितीत कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. शेतीमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल आहेत. वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. याबाबत वडगाव रासाईचे शेतकरी सुभाष ढवळे म्हणाले की, कंपनीच्या वीजबिलामध्ये आकारणी करताना ताळमेळ असायला हवा. मागील तीन महिन्यांपूर्वी दहा एचपीचे भरलेले बिल या वेळेस वीस एचपीचे आकारण्यात आले आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू न केल्यास महावितरण विरोधात शेतकरी मोठे आंदोलन करतील.

रांजणगाव सांडसचे संभाजी रणदिवे म्हणाले की, महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नियोजन कोलमडले आहे. वीज तोडणीबाबत रांजणगाव सांडसचे संतोष लोखंडे यांनीही संताप व्यक्त केला.

वीजबिल भरून सहकार्य करावे : अभियंता टेंगले न्हावरे (ता. शिरूर) येथील सहायक अभियंता बाळासाहेब टेंगले म्हणाले, की कृषी संजीवनी योजनेनुसार थकबाकीदारांना दिलेले हप्ते व चालू बिलाची रक्कम भरल्यानंतर तत्काळ वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. ज्यांचे अधिकृत वीज कनेक्शन नाही त्यांनी त्वरित अर्ज करावा. कंपनी नियमानुसार त्यांना त्वरित वीजपुरवठा देण्यात येईल. शिरूर उपविभागात ३०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून कार्यवाही करण्यात येत आहे. वीजबिलाचा भरणा करून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com