शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देणार ‘उभारी’

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रशासनाकडून उभारी उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी नाशिक विभागात १ हजार ३४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
farmer
farmer

नगर ः आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रशासनाकडून उभारी उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी नाशिक विभागात १ हजार ३४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात नगर जिल्ह्यातील सर्वाधिक ४४९ शेतकरी कुटुंबे आहेत. या कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार जे कुटुंब सरकारी योजनेला पात्र ठरणार नाहीत त्यांना लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था व दानशुरांच्या मदतीने लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यावर त्या कुटुंबाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. अशा कुटुंबाला सरकारी आधार मिळावा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळावा आणि ती कुटुंबे आत्मनिर्भर व्हावीत यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेवरून नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यांत ‘उभारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून संबंधित कुटुंबाला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ देता येईल यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य प्रशासनातील अधिकारी व वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कुटुंबे नेमून दिली आहेत.  दहा दिवसांपासून हे सर्वेक्षण सुरु आहे. विभागात १ हजार तीनशे ४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात नगरमधील सर्वाधिक ४४९ कुटुंबांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत ८९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ४४९ शेतकरी आत्महत्येमुळे मिळणाऱ्या लाभाला पात्र ठरली आहेत. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या आदेशानुसार शेतीला मदत व्हावी या अनुषंगाने सिंचन विहिरीसह पूरक व्यवसायासाठी शेळीपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, दूधव्यवसाय व इतर योजनांसह कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आता सरकारी अधिकारीच प्रयत्न करत आहेत. अपात्र कुटुंबांनाही मदत जी कुटुंबे सरकारी योजनांसाठी नियमानुसार पात्र ठरणार नाहीत. त्यांना सामाजिक, सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी यांची मदत घेऊन संबंधित कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुरू केले असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संबंधित कुटुंबाला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनातील प्रमुख ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यामुळे अशी कुटुंबे भविष्यात चांगले, स्वाभिमानाने व आत्मनिर्भरतेने जीवन जगू शकतील यासाठी काम सुरू आहे.  - संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com