पीकविमा योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी : उध्दव ठाकरे

पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांनाच संपूर्ण लाभ मिळाला पाहिजे. सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा. हा पैसा सरसकट मिळावा नाहीतर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा. ही योजना म्हणजे विमा कंपनी बचाव योजना नाही. - उध्दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीकविमा योजनेमध्ये घोटाळा होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी. शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर सत्ता व युती काय कामाची असा इशाराही श्री. ठाकरे यांनी दिला. 

मुंबईत शुक्रवारी (ता. २३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेच्या प्रामाणिकतेबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, की जून महिन्यात पीकविमा योजनेबाबत शिवसेनेने मोर्चा काढला होता. त्यात पंधरा दिवसांची मुदत कंपन्यांना दिली होती. शिवसेनेचे सर्व खासदार याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि योजनेत काय सुधारणा करता येईल हे सांगितले. शिवसेनेने प्रत्येक  तालुक्यात पीकविमा मदत केंद्रे उभारली होती. पीकविमा योजनेत ५३ लाख शेतकरी पात्र तर ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. शिवसेनेने पीकविम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मदत झाली. मात्र, शेतकऱ्यांना देणे असलेले २००० कोटी रुपये कंपन्यांकडे अजून पडून आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांची आहे. पीकविमा योजनेमध्ये दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात, तर उर्वरित ९८ टक्के रक्कम सरकारकडून दिली जाते. मात्र, विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. शिवसेनेकडे या योजनेबद्दल तक्रारी आल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

पीकविमा योजना हा घोटाळा आहे. या योजनेतील झारीतील शुक्राचाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसेच ९० लाख शेतकऱ्यांना कोणी अपात्र ठरवले. त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज आहे. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. नफा कमावण्यासाठी विमा कंपन्या नाहीत. एक रुपयाचीही गुंतवणूक या कंपन्यांची नसताना नफा कशासाठी  असा सवालही श्री. ठाकरे यांनी केला.

वाशीम जिल्ह्यातील महिला शेतकरी सोनाली राठोड यांना दोन एकराला १०२ रुपये भरपाई मिळाली, अशाप्रकारे हा घोटाळा सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना आम्ही पैसे मिळवून दिले आहेत, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुष्काळ आणि पूर सरकारला दिसत आहे पण या कंपन्या दिसत नाही का? या योजनेअंतर्गत ज्या सुधारणा गरजेच्या आहेत त्याबद्दल पंतप्रधानांशी बोलू, जर कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर या विरोधात शिवसेना आंदोलन करेल असा इशाराही श्री. ठाकरे यांनी दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com