यवतमाळ : यंदा कापूस खरेदीचे वांदे झाल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे आहे. मात्र, बियाणे कंपन्यांनी विकेलेले बियाणे उगवत नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील शेतकरी अभय उबाळे यांनी चक्क दहा एकर पेरणी केलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरविला. दरम्यान, नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या मागे एकामागून एक संकटे येत आहेत. यंदा पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत. मुळावा येथील शेतकरी अभय उबाळे यांनी दहा एकरांवर सोयाबीनची पेरणीनंतर पाऊस आल्याने पेरणी साधेल, असा विश्वास होता. मात्र, पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनवरच नांगर फिरविला.
सरकारमान्य कंपनीकडून प्रमाणित बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दुबार पेरणी करायची ठरविली तरी पुन्हा कोणते बियाणे वापरायचे, बियाणे खरेदीसाठी पैसे आणायचे कोठून असे अनेक आहेत. त्यामुळे यंदाही खरीप हंगाम हातचा जाण्याची चिन्हे आहेत. जूनच्या सुरुवातीला परिसरात दमदार पाऊस झाल्याने १८ जूनपर्यंत मुळावासह परिसरातील बहुतांश शेतकरी वर्गाची पेरणी आटोपली. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगविलेच नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती व जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तातू देशमुख यांनी वानेगाव, पार्डी बंगला, धनज, मोहदरी, आडद, पिंपळदरी, झाडगाव, तिवरंग, सुकळी, हातला, दिवटपींपरी, कळमुला, पळशी, कुपटी, पोफाळी, भांबरखेडा आदी गावांत पाहणी केली. या वेळी माजी उपसरपंच संजय रावते, जीवन ठेंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शबीर भाई, सोसायटीचे अध्यक्ष भय्यासाहेब देशमुख, अनिल बरडे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.