पुणे : अरबी समुद्रात कमीदाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर राज्यावर गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. कीड-रोगांना हे वातावरण पोषक असल्याने खरिपातील तूर, रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी पिकांसह भाजीपाला आणि द्राक्ष, आंबा, डाळिंब फळपिकेही अडचणीत आले आहेत. अशातच पाऊस सुरू झाल्याने दव-धुक्यामुळे पिकांचे नुकसान वाढण्याची भीती असून शेतकऱ्यांचा खर्चही वाढणार आहे.
पाऊस गेल्यानंतर थंडी सुरू होईल तसेच कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ज्या बागेत सेटिंग झाले आहे, तेथे अडचणी वाढतील. पावसानंतर धुके आणि दवाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.ज्या विभागात दव आणि धुक्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते तेथे डाऊनीचे बिजाणू पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागायतदारांनी याकडे लक्ष द्यावे. सध्या मृग बहराची फळे बागेत आहेत. डिसेंबर,जानेवारीपर्यंत फळांची काढणी होणार आहे. पाऊस जास्त काळ राहिला तर फळांवर बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्या बागा ताणावर आहेत आणि पानगळ झालेली आहे, त्या ठिकाणी २ ते ४ दिवस जोराचा पाऊस राहिला तरच ताण तुटण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने बागेचे पुढील नियोजन बदलावे लागले. ज्या बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, तेथे रोग वाढण्याची शक्यता. परंतु, ज्या बागा निरोगी आणि घडवाढीच्या अवस्थेत आहे, त्यांना या आद्रतेचा फायदा होणार आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाला, तर अंबिया बहराचा ताण तुटेल.त्यामुळे पुढे फुलोऱ्याऐवजी पालवी फुटण्याची शक्यता आहे. फळधारणा झालेल्या बागांमध्ये फारसा परिणाम जाणवणार नाही. काही ठिकाणी अनुकूल वातावरणामुळे रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या मोसंबी बागा ताणावर आहेत. सध्याच्या वातावरणाचा फारसा परिणाम ताणावर होणार नाही. सध्याच्या काळात मोसंबी बागेत फारशा अडचणी येणार नाहीत. मराठवाड्यात सध्या केसर आंब्याला ६० टक्यांपर्यंत मोहोर दिसू लागला आहे. ढगाळ वातावरण कायम राहिले तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. काही बागांच्यामध्ये तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. सध्या कोकणात ढगाळ हवामान आहे, काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये आंबा कलमावर तुडतुडे, फुलकिडी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणाच्यादृष्टीने कीडनाशकांची फवारणी बागायतदारांनी करावी. जेथे काजू पीक पालवी आणि मोहोराच्या अवस्थेमध्ये आहे, तेथे सध्याच्या प्रतिकूल वातावरणामध्ये ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मीठा बहर धरलेल्या बागेत सध्याच्या वातावरणामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सध्या खट्टा बहराची फळे आहेत. जोराचा पाऊस झाला तर फळाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. सीताफळाचा बहर संपलेला आहे. बागा ताणावर सोडलेल्या आहेत. त्यामुळे या प्रतिकूल हवामानाचा फारसा परिणाम जाणवणार नाही. ज्वारी, हरभरा,गहू,करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. सध्याचे ढगाळ वातावरण जास्त काळ राहिले तर भाजीपाला पिकांमध्ये करपा आणि केवडा रोग तसेच फुलकिडे, मावा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिफारशीत कीडनाशकांची फवारणी गरजेची आहे... प्रतिक्रिया... ज्या बागा काढणी योग्य तयार होऊन ज्यामध्ये साखर १८ ते १९ ब्रिक्स इतकी उतरली होती. अशा बागांमध्ये अवकाळी पावसामुळे तडे जण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. १०० रुपयांपर्यंत दर मिळत असताना हे नुकसान मोठे आहे. त्यामळे शेतकरी हतबल झाला आहे. - खंडेराव शेवाळे, प्रयोगशील शेतकरी, भुयाणे, ता.सटाणा