कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली

कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली

कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात कोणत्याही परिस्थितीत एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय ऊसतोड सुरू करणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतल्याने रविवारी (ता.१७) ऊस दराच्या तोडग्यासाठी बोलावलेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. कारखानदारांनीही या मागणीबाबत फारसे भाष्य न केल्याने पुढील बैठक २५ तारखेस घेण्यात येणार असल्याची माहिती कारखाना प्रतिनिधींनी दिली. तोडगा न निघल्याने ऊस हंगाम सुरळीत होण्याबाबतचे त्रांगडे कायम राहिले आहे. 

यंदा पूरस्थिीतीमुळे उसाचे मोठे नुकसान झाले. याबाबत तातडीने तोडगा निघावा यासाठी साखर कारखाना प्रतिनिधींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कारखानदारांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, गणपतराव पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक आदींशी चर्चा केली.

कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याबाबत असमर्थता व्यक्त केल्याने बैठकीचा सूर पालटला. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत एफआरपीचे तुकडे करण्याच्या निर्णयास विरोध केला. तुमचा असा निर्णय असेल तर आम्हाला मान्य नाही, असे सांगत कार्यकर्ते बाहेर पडले.  सध्या उसाची परिस्थिती बिकट आहे. यामुळे कारखानदारांचे व शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ नये, कारखाने व्यवस्थित चालावेत या भूमिकेतून आम्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना बैठकीस बोलावल्याचे श्री. पाटील व श्री. आवाडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी साखर दर व कारखान्यांच्या कर्जाबाबत विपरीत परिस्थिती असल्याने यंदा एफआरपी एकरक्कमी देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. ‘स्वाभिमानी’च्या प्रतिनिधींचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले. त्यांची ऊस परिषद २३ तारखेस होणार आहे. यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले. यामुळे आम्ही २५ ला पुन्हा बैठक बोलावल्याचे श्री. पाटील व श्री. आवाडे यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत कारखाने सुरू ठेवायचे की नाही, याबाबतचा निर्णय मात्र आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व सावकार मादनाईक यांनी कारखानदारांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘कारखानदरांनी एफआरपीची रकम देण्याबाबत तयारी केली असेल, असे समजून आम्ही बैठकीस आलो; परंतु येथे आल्यानंतर त्यांनी एफआरपीचे तुकडे करण्याबाबत भूमिका घेतल्याने आम्ही त्यांना हंगाम सुरू करण्यास विरोध केला. सध्या कमी रिकव्हरीने साखर कारखाने सुरू आहेत. याचा तोटा सगळ्यांनाच होत आहे. यामुळे कारखानदार तातडीने कारखाने हंगाम का सुरू करत आहेत,’’ असा सवाल श्री. पाटील व श्री. मादनाईक यांनी व्यक्त केला.

आमची ठोस भूमिका ऊस परिषदेतच जाहीर होईल. आम्ही आजही एकरकमी एफआरपीबरोबरच त्यापेक्षा जास्त रक्कम मिळविण्यासाठीच आग्रही असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. हा निर्णय होइपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कारखाने सुरू करू देणार नाही. कारखाने सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी ‘स्वाभिमानी’ने दिला.   

कारखानदारांत एकवाक्‍यतेचा अभाव बैठक सुरू असतानाच कारखाने बंद करण्यारून काही कारखानदारांत मतभेद दिसून आले. काही कारखान्यांनी कारखाना सुरू करण्याबाबत, तर काहींनी बंद ठेवण्याची भूमिका घेतली. यामुळे या बैठकीत निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवायचे की सुरू ठेवायचे, असा निर्णय होऊ शकला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com