लोहारा, जि. उस्मानाबाद :नववर्षाच्या प्रारंभीच शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी (ता.२) पहाटे सुरू झालेला पाऊस सकाळी आठपर्यंत सुरू होता. या अवकाळी पावसाचा फटका फळबागांसह काढणीला आलेल्या तूर पिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातातून गेला आहे. आता शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर आहे. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हरभरा पिकांवर किड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच आता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पावसास सुरवात झाली. सुरवातीला पाऊण तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सहापर्यंत हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, साडेसातच्या सुमारास पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यानंतर अर्धा तास पाऊस झाला. शहरासह नागूर, मार्डी, बेंडकाळ, कास्ती, मोघा, नागराळ, हिप्परगा, खेड, धानुरी, कानेगाव, उंडरगाव, माळेगाव या भागात जोरदार पाऊस झाला. अन्य भागात हलका व मध्य स्वरूपाचा पाऊस झाला.
या अवकाळी पावसाचा फटका काढणीला आलेल्या तूर पिकांबरोबरच कांदा व फळबागांना बसत आहे. यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसाचा ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना चांगलाच फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.