नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा दावा जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे केला आहे. यातील १३ हजार दाव्याबाबत पंचनामे झाल्याची माहिती विमा कंपनीकडून मिळाली.
जिल्ह्यात मागील महिन्यात १७ ते १९ फेब्रुवारी या तीन दिवसांत अवेळी पाऊस झाला. हा पाऊस मोठा नसला तरी शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे नुकसान झाल्याचा दावा आहे. यात गहू, हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा कंपनीकडे अर्ज केले आहेत. हे दावे इमेल, टोल फ्री क्रमांक तसेच क्रॉप इन्शुरन्स ॲपवर दाखल केले आहेत.
या दाव्यानंतर कंपनीच्या वतीने १३ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करण्यात आला. परंतु, यात पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले. तीन दिवस झालेल्या अवेळी पावसादरम्यान वादळी वारे तसेच गारपीट झाली नाही. या कालावधीत पीक उभे असल्यामुळे नुकसान झाले नसल्याचे कंपनीच्या सूत्राने सांगितले.
वन्य प्राण्यांमुळे नुकसान
अर्ज दाखल केलेल्या तालुक्यात मुखेड तालुक्यातून सहा हजार ६६६, तर नायगाव तालुक्यातून तीन हजार दावे दाखल झाले होते. काही शेतकऱ्यांनी रोगराईमुळे तसेच वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्याचे दावे दाखल केले आहेत, अशी माहितीही मिळाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.