चांदोली धरणातून उच्चांकी पाणीउपसा
चांदोली धरणातून उच्चांकी पाणीउपसा

चांदोली धरणातून उच्चांकी पाणीउपसा

सांगली : म्हैसाळ योजनेच्या पाणीउपशाने तब्बल सव्वाशे दिवसांचा टप्पा गाठला. आतापर्यंत सात टीएमसी पाण्याचा चांदोली धरणातून उपसा झाला; तो उच्चांकी ठरला आहे. यातील दोन टीएमसीचा वापर पिण्यासाठी झाला. उर्वरित पाणी शेतीच्या सिंचनासाठी सोडले. सिंचनापोटी २ कोटी ४८ लाखांची वसुली झाली. पाच टीएमसी पाण्यासाठी साडेआठ कोटी रुपये वसुलीची अपेक्षा होती; मात्र अद्याप सहा कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत आहेत. पिण्याच्या दोन टीएमसी पाण्याचे पैसे शासनाकडून मिळतील, अशी माहिती मिळाली. 

म्हैसाळ योजना सुरू होऊन चार महिन्यांहून अधिक दिवस झाले. या योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि तासगावच्या काही भागांतील शेतीला पाणी मिळाले. यामुळे दुष्काळी भागातील पाणीटंचाई काहीशा प्रमाणात कमी होण्यास मदत होते, परंतु अद्यापही मुख्य कालव्यातून पाणी पुढे जात असल्याने पूर्ण लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही. यामुळे पोटकालव्यातून पाणी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

पिण्याच्या पाण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्‍यात १२४ आणि जत तालुक्‍यात ६१ तलाव भरण्यात आले, असे पाटबंधारे विभागाने सांगितले. मात्र, ही आकडेवारी कागदोपत्रीच आहेत. वास्तविक पाहता तलावात पाणी नाही. त्यामुळे पाटबंधारे विभाग केवळ कागदपत्रे रंगवून दिशाभूल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.  

म्हैसाळ योजनेचे आवर्तन शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे पंपांची संख्या कमी करण्यात आली. सध्या जतच्या काही भागांत पाणीपुरवठा सुरू आहे. सहाव्या टप्प्याच्या तीनही पंपगृहांची चाचणी यशस्वी झाल्याने जतच्या काही भागाला दिलासा मिळाला, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com