अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी ०.६७८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तशा मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे तिवसा शहराचा पेयजलाचा प्रश्न कायमस्वरुपी संपेल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीसाठी ०.६७८ दलघमी मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजुरी मिळण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तिवसा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ०.६७८ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. तिवसा शहराची सन २०३८ ची अंदाजित लोकसंख्या विचारात घेऊन पाणी आरक्षणास मंजुरी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची हक्क मंजूर झाल्याने पेयजलाचा प्रश्न संपुष्टात येण्याबरोबरच दीर्घकाळ पाण्याची उपलब्धता राहणार आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांच्याकडून पिण्याच्या पाणी आरक्षणापोटी सिंचन पुन:र्स्थापना खर्च घेतला जाणार नसल्याचे निर्णयात नमूद आहे. तिवसा नगरपंचायतीने संपूर्ण सेवा क्षेत्रात बंदिस्त नलिका मल:निसारण प्रणाली व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेसोबतच तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ शकेल. राज्य जल परिषदेच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या कमीत कमी ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करून ताज्या पाण्याची गरज कमी करण्याचेही शासनाचे निर्देश आहेत. कोणत्याही वर्षासाठी पाण्याचा वास्तविक कोटा त्या वर्षाच्या १५ ऑक्टोबर रोजी स्त्रोत जलाशयाच्या पाण्याची साठवण स्थिती व निश्चित केलेल्या तूट वाटण्याची सूचनेनुसार नदी खोरे अभिकरणाद्वारे निश्चित केला जातो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.