नाशिक : खरिपाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाचवेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये, वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
खरिपासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषिमंत्री श्री. भुसे बुधवारी (ता. १२) मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. या वेळी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले, कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मॉन्सून चांगला होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख टन युरियाचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ व महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे.
या वर्षी केंद्र शासनाकडून ४२ लाख ५० हजार टन खत मंजूर केले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार टन साठा शिल्लक असून, त्यामध्ये युरिया ५ लाख ३० हजार टन, डीएपी १ लाख २७ हजार टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.