आपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा कालावधीचा फायदा घ्यायचा असेल तर दुभत्या जनावरांची ऊर्जेची गरज भागवावी लागेल. जेणेकरून त्याचे पुढील जीवन चक्र सुरळीत चालेल. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना बायपास फॅट पुरवणे आवश्यक आहे. सुका चारा, ओला चारा आणि कमी दर्जा असलेल्या गोळी पेंडीतून दुभत्या जनावरांच्या ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन बायपास फॅट, कोलीन, मेथिओनिन आणि स्टार्च यांसारख्या पूरक अन्न घटकांचा वापर केला पाहिजे. बायपास फॅटचे पचन दुभत्या जनावरांच्या कोठीपोटात न होता सरळ आतड्यात होते. त्यापासून मिळणारी संपूर्ण ऊर्जा ही दुग्धोत्पादनासाठी वापरली जाते. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. दुभत्या जनावरांच्या संक्रमणकाळात (विण्याच्या २१ दिवस आधी व २१ दिवसांनंतरचा काळ) शुष्क पदार्थांचे ग्रहण जवळपास ३० टक्के आणि वजन जवळपास ८० ते १०० किलोने कमी होते, त्यामुळे व्यायल्यानंतरच्या ९० दिवसांच्या काळात शारीरिक वाढ आणि दुग्धोत्पादनासाठी लागणारी ऊर्जा ही त्यांच्या खाद्यातून पूर्ण होऊ शकत नाही. याचाच परिणाम म्हणजे गाई, म्हशी शारीरिक वाढ आणि दुग्धोत्पादनासाठी स्वतःच्या शरीरात साठवलेली ऊर्जा वापरण्यास सुरुवात करतात. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात होते. सोबतच शरीराला पुन्हा ऊर्जेची साठवण करायला २०० ते २५० दिवसांचा कालावधी लागतो. याचा दुष्परिणाम दूध उत्पादन आणि प्रजनन संस्थेवर होतो. साठ दिवसांचा भाकड काळ अति महत्त्वाचा
दुभत्या जनावरांच्या गाभण काळातील शेवटचे ४५ ते ६० दिवस अति महत्त्वाचे असतात. पशुपालकाने हे लक्षात घ्यायला हवे की, जरी आपली गाय किंवा म्हैस या काळात दूध देत नसली तरी ती स्वत:ला पुढच्या वेतासाठी तयार करीत असते. संशोधनाअंती असे दिसून आले की, गाय, म्हैस यांचा भाकड काळ हा कमीत कमी ४५ दिवस असायला पाहिजे. या काळात त्यांची ऊर्जेची गरज भागवली गेली पाहिजे. असे न झाल्यास पुढल्या वेतात त्यांचे दुग्ध उत्पादन जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी कमी होते. या ऊर्जेच्या कमतरतेमुळे गाय, म्हैस विल्यानंतर दुग्ध ज्वर, यकृताचा आकार वाढणे, लंगडेपणा, पोटात पीळ पडणे, जार पडण्यास विलंब होणे किवा न पडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुभत्या काळातील सुरुवातीचे १०० ते १२० दिवस सर्वात महत्त्वाचे
व्यायल्यानंतर दुभत्या जनावरांमध्ये ऊर्जेची गरज भरपूर प्रमाणात वाढते. कारण, त्यांच्या दुभत्या काळातील पहिले १०० ते १२० दिवस हे सर्वात जास्त दूध देण्याचे असतात. या काळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते. या काळातच जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोर) खालावतो. कारण दुधावाटे पोषकद्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. विण्यापूर्वी जनवारांचे शुष्क ग्रहण हे ३० टक्क्यांपर्यंत घटल्यामुळे जनावरांची ऊर्जेची गरज भागवली जात नाही. त्यामुळे दुधासाठी लागणारी ऊर्जा ही त्यांच्या शरीरात साठवून ठेवलेल्या फॅटपासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यकृतावर याचा जास्त भार येण्यास सुरवात होते. शरीरातील चरबी यकृतावर जमा होऊन फॅटी लिव्हर आजार होण्याची शक्यता बळावते. एकीकडे दुभत्या जनावरांची प्रकृती ढासळत जाते तर दुसरीकडे यकृताचा आकार मोठा होत जातो. परिणामी दुग्ध ज्वर, यकृताचा आकार वाढणे, लंगडेपणा, पोटात पीळ पडणे, जार पडण्यास विलंब होणे किंवा न पडणे अशा अनेक समस्या दिसतात. जर आपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा कालावधीचा फायदा घ्यायचा असेल तर दुभत्या जनावरांची ऊर्जेची गरज भागवावी लागेल. जेणेकरून त्याचे पुढील जीवन चक्र सुरळीत चालेल. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना बायपास फॅट पुरवणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम कॅल्शिअमशी संयुग करून पहिल्यांदा बायपास फॅट तयार करण्यात आले. ज्यामध्ये १६ टक्के कॅल्शिअम व ८४ बायपास फॅट होते. उग्र वास, कोठी पोटात होणारे विघटन व कमी प्रमाणात उपलब्ध होणारे फॅट यामुळे त्याच्या वापरात काही मर्यादा आल्या. पुढील टप्प्यात हायड्रोजनेटेड संरक्षित बायपास फॅट वापरात आले, पण त्यामध्ये वापरात येणाऱ्या निकेलच्या दुष्परिणामांमुळे त्याचा वापर अल्पावधीतच कमी झाला. त्यानंतर आणखी बदल घडून खंडित फॅट विकसित झाले. ज्यामध्ये ९९ टक्के फॅट उपलब्ध असून त्यापासून जनावरांना मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण १०० टक्के असते. आत्ताचे सर्वात संरक्षित बायपास फॅट नॅनो तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये फॅट व फॉस्फेटिडेल्कोलीन जे ऊर्जेची पूर्तता करते. सोबत यकृतावर जमा झालेल्या फॅटला काढण्याचे काम करते. हे फॅट दूध उत्पादन वाढ आणि सोबतच यकृतात ग्लुकोज बनवण्याची प्रक्रिया जलद होऊन दूधवाढीस उपयुक्त ठरते. गोळीपेंडीमध्ये बायपास फॅटचा वापर
गोळीपेंडमध्ये बायपास फॅट वापरणे केव्हाही फायद्याचे ठरते. कारण पारंपरिक पद्धतीने जेव्हा गोळी पेंड बनवितात तेव्हा त्यामध्ये फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी राइस पॉलिशचा वापर करतात. राइस पॉलिशमध्ये असणाऱ्या फॅटमध्ये मुक्त फॅटी आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गोळी पेंडमध्ये एक रासायनिक प्रक्रिया घडून काही विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे गोळीपेंडीला एका प्रकारचा उग्र वास येतो, सोबतच बाकीच्या अन्नघटकांच्या पचनाची टक्केवारी सुध्दा कमी होते. त्यामुळे गोळीपेंडीमध्ये फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी बायपास फॅट हा सर्वोत्तम पर्याय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राइस पॉलिशमधील फॅट बऱ्याच प्रमाणात कोठी पोटात विघटीत होते आणि हवी असलेली ऊर्जा मिळत नाही. ताणावर बायपास फॅटचा हा चांगला पर्याय उन्हाळ्यात तापमानामध्ये खूप तफावत आढळून येते. सोबतच प्रखर सूर्यकिरणे आणि मंद वारा यामुळे दुभत्या जनावरांवर ताण पडून दूध उत्पादन कमी होते. संशोधनाअंती असे आढळून आले की, दुभत्या जनावरांच्या आहारात उन्हाळ्यात प्रती दिन एक लिटर दुधामागे २० ग्रॅम बायपास फॅट वापरल्यास उन्हामुळे आलेला ताण कमी होण्यास मदत होते.
दुभत्या जनावरांना ऊर्जा मिळते. दुग्ध उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ. दुधामधील फॅटचे प्रमाण वाढवण्यास मदत. सुरवातीच्या जास्त दूध देण्याच्या दिवसांमध्ये वाढ. जनावरांच्या प्रजनन क्षमतेमध्ये सुधारणा. विल्यानंतर शारीरिक वजन कमी होत नाही. उन्हाळ्यातील ताणापासून संरक्षण. संपर्क- डॉ. अमित शर्मा, ९६७३९९८१७६ (लेखक बर्ग + श्मिट (इंडिया) प्रा. लि., पुणे येथे कार्यरत आहेत.)