मराठवाड्यातील ८२४ प्रकल्पांत उपयुक्त पाणी २५ टक्क्यांच्याही खाली

मराठवाड्यातील ८२४ प्रकल्पांत उपयुक्त पाणी २५ टक्क्यांच्याही खाली
मराठवाड्यातील ८२४ प्रकल्पांत उपयुक्त पाणी २५ टक्क्यांच्याही खाली

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ पैकी ८२४ प्रकल्पांत २५ टक्‍केही उपयुक्‍त पाणी नाही. यामध्ये ७४९ लघू, तर ७५ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. ११ पैकी ५ मोठ्या प्रकल्पांतही उपयुक्‍त पाण्याची वाणवा आहे. दुसरीकडे २०१ लघू, तर १७ मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंबही नाही. सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प, निम्न मनार व विष्णूपुरी हे तीन प्रकल्प आजघडीला तुडुंब आहेत, एवढीच मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब आहे.  

यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाचा अभाव अनुभवलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाचीही अजून म्हणावी तशी समाधानकारक कृपा झाली नाही. वार्षिक सरासरीच्या केवळ ७५ टक्‍केच पाऊस मराठवाड्यात पडला. त्यामुळे प्रकल्पांची तहान भागलीच नाही. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सिद्धेश्‍वर, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या पाच प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७५ पैकी १७ मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेठाकच आहेत. २४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे.

बीड, लातूर, उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यातील ४१ प्रकल्पात अजूनही ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पाणी साठले नाही. ७४९ पैकी तब्बल २०१ लघू प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. २०९ लघू प्रकल्पातील पाणी जोत्याखाली, तर १०२ प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणी आहे. ५७ लघु प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के, ३८ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के, तर १४२ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्य सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ ५ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. याच प्रकल्पांमध्ये २०१७ मध्ये ४१ टक्‍के, तर २०१८ मध्ये केवळ ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा १५ ऑक्‍टोबरअखेर झाला होता. याचा अर्थ गतवर्षीप्रमाणेच यंदाही जालना दुष्काळाच्या रडारवर आहे.

बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पात यंदा १५ ऑक्‍टोबरअखेर केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. याच तारखेला २०१७ मध्ये हा पाणीसाठा ७१ टक्के, तर २०१८ मध्ये केवळ ५ टक्‍केच होता.  बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. २०१७ मध्ये याचवेळी ते ९७ टक्‍के, तर २०१८ मध्ये १२ टक्‍के होते. त्यामुळे या जिल्ह्यालाही पुन्हा एकदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे.

लातूर जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. २०१७ मध्ये याचवेळी या प्रकल्पांमध्ये ८१ टक्‍के, तर २०१८ मध्ये ३१ टक्‍के उपयुक्‍त पाणी होते. अर्थात परतीच्या पावसाची दमदार ते जोरदार हजेरी लागून प्रकल्प तुडुंब झाले, तरच संकटाचे ढग थोडे विरळ होण्याची चिन्ह आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com