कोरडवाहू शेतीमध्ये कोणत्याही एका पिकाचा विचार करण्यापेक्षा कौटुंबिक गरज आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या शाश्वत पीकपद्धतीचा विचार केला पाहिजे. सर्वसाधारणपणे दुबार किंवा बहुविध पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, पट्टापेर, साखळी आणि आंतरपीक या पद्धती प्रचलित आहेत.
जमीन, हवामान विशेषतः पर्जन्यमान आणि सिंचन सुविधांच्या उपलब्धतेनुसार पिकांची रचना आणि त्यानुसार शेती व पीक पद्धत ठरवली जाते. अलीकडे बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी, हंगामानुसार मिळणारा दर, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनास वाव या बाबीही पीकपद्धती ठरविण्यास कारणीभूत ठरतात. मात्र, कोरडवाहू शेती संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असते. तिथे पीकपद्धती आणि पीक रचना बदलण्यास खूप मर्यादा येतात. अशा ठिकाणी शाश्वत ठरतील, अशा पीक पद्धतींचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या कौटुंबिक गरजा आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. दुबार किंवा बहुविध पीक पद्धती या पद्धतीत एक वर्षात पहिले पीक निघाल्यानंतर त्याच शेतात दुसरे आणि शक्य असेल तर दुसऱ्यानंतर तिसरे पीक घेतले जाते. खोल कसदार जमीन आणि हमखास पाऊस पडणाऱ्या विभागात किंवा सिंचन सुविधा असल्यास या पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. उदा. मुग, उडीद, घेवडा, तीळ, सोयाबीन यासारख्या कमी कालावधीच्या खरीप पिकानंतर रब्बी हंगामात रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, सूर्यफूल, रब्बी मका, गहू इ. पिके घेतली जातात. मिश्र पीक पद्धती या पीक पद्धतीत दोन किंवा अधिक पिकाचे बियाणे ठरावीक प्रमाणात एकत्र करून पेरणी केली जाते. त्यामुळे प्रत्येक ओळीत कमी-अधिक प्रमाणात मिश्रण केलेली सर्व पिके वाढतात. या पद्धतीचे काही फायदे असले तरी तण नियंत्रण, पीक संरक्षण, आंतरमशागत, पीक काढणी यामध्ये अडचणी येतात. परिणामी ही पद्धत सध्या शेतकरी फारशी वापरत नाहीत. मात्र, हलक्या-उथळ आणि कमी उत्पादकता असणाऱ्या जिरायत शेतीत तिचा अवलंब केला जातो. पट्टापेर पद्धत या पीक पद्धतीत हलक्या आणि चढ-उताराच्या जमिनीत बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोद्रा, तृणधान्ये, मटकी, कुलथी, चवळी यासारख्या पिकामध्ये जमीन झाकणाऱ्या कडधान्याचे पट्टे पेरले जातात. उतारास आडवे तृणधान्यानंतर कडधान्याचा पट्टा असे एक आड एक पट्टे पेरल्याने जमिनीची धूप कमी होते. जमिनीचा ओलावा अधिक काळ टिकून राहतो. तृणधान्य -कडधान्याच्या एकत्रित येण्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते. एकूण उत्पादनात वाढ होते. साखळी पीक पद्धत पहिले पीक काढणीस तयार होण्यापूर्वीच पिकाच्या दोन ओळीत दुसऱ्या पिकाच्या बियाण्याची टोकण केली जाते किंवा रोपे लावली जातात. पहिले पीक तयार होत असताना शेवटच्या दोन तीन आठवड्यात त्याला ओलाव्याची गरज नसते. अशा वेळी जमिनीतील ओलाव्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय होत असतो. शिवाय पहिले पीक निघाल्यानंतर दुसऱ्या पिकासाठी मशागत करत असताना आणि दुसऱ्या पिकाची उगवण आणि वाढ होऊन जमीन झाकली जाईपर्यंत सूर्यप्रकाशामुळे जमिनीतील ओलावा फारच कमी होतो त्याची झळ पुढील पिकास बसते. शिवाय एकानंतर दुसरे पीक घेण्याने एकूण कालावधी वाढतो. आंतर पीक पद्धत
आंतर पीक फायदेशीर
जमिनीचा प्रकार आणि सरासरी पाऊसमान यानुसार ठरवा आंतरपिके
संपर्क- डॉ. एस. एस. विटनोर, ९५२७६७५१०३ डॉ. डी. जी. इंगोले, ८९५६८३३८८९ व्ही. एम. भराडे, ९०९६९५८२३३ (सहायक प्राध्यापक, छत्रपती शाहू महाराज, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, औरंगाबाद.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.