शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार : नाईक निंबाळकर

शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार : नाईक निंबाळकर
शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार : नाईक निंबाळकर

दहिवडी, जि. सातारा : उन्हाळी पावसाची अपेक्षा होती, पण तो झाला नाही, अशा दुष्काळी व अनुत्साही परिस्थितीत खरीप हंगाम पूर्व बैठक होत आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतीला विशेष महत्त्व देऊन शेतकऱ्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी विविध योजना राबवू, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

माण पंचायत समिती दहिवडी येथील बचत भवन सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेत ते बोलत होते. या वेळी कृषी सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, माण पंचायत समितीचे उपसभापती नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्य डाॅ. भारती पोळ व बाबासो पवार, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, गटविकास अधिकारी गोरख शेलार, कृषी अधीक्षक प्रकाश सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार, मोहीम अधिकारी बापूसाहेब शेळके, सहायक गटविकास अधिकारी भरत चौगले आदी मान्यवर उपस्थित होते.

नाईक निंबाळकर म्हणाले की, ‘‘बियाणे, खताची कसलीच अडचण सध्या नाही. पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोणी विचारातच घेत नाही. माणमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. चांगली कामं झाल्यामुळे जर पाऊस चांगला झाला तर दुष्काळातून थोडी मुक्ती मिळू शकते. कर्मचाऱ्यांनी रजा न घेता पाणीपुरवठा व्यवस्थित होतो की नाही, छावण्यात चारा पोचतो की नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे. पाण्याच्या खेपा शंभर टक्के कशा होतील हे पहावे लागेल. ग्रामसेवकांनी आपल्या नेमून दिलेल्या गावी थांबून याचे नियोजन करण्याची गरज आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत हे लक्षात ठेवून, दुष्काळाला गांभीर्याने घेऊन काम करावे.’’

कृषी व पशु संवर्धन सभापती मनोज पवार म्हणाले की, गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे आपल्याला मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागले. गंभीर दुष्काळ जाहीर झाल्यामुळे अठरा ते वीस कोटींचा विमा शेतकऱ्यांना देता आला. शेती शाळेच्या माध्यमातून हुमणी व लष्करी अळीबद्दल जागृती करून शेतकऱ्यांना संकटापासून वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ऋतूमध्ये झालेला बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नियोजन करण्याची गरज आहे. बियाणांसाठी माणला चार लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवजारांसाठी सुद्धा मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अध्यक्षांनी जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे अंदाजपत्रक एक कोटीचे वाढवून पाच कोटी केले आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे हीच अपेक्षा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com