कोल्हापूर : येथील बाजार समितीतील भाजीपाल्याचे सौदे सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही (ता. १६) बंदच राहिले. येथून पुढील काळात शुक्रवारपर्यंत गर्दी टाळण्यासाठी भाजीपाल्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय झाला होता. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाजीपाल्याची आवक झाली नाही. सौदे झाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शहरातील विविध भागात जाऊन भाजीपाल्याची थेट विक्री केली. भाजीपाल्याचे सौदे झाले नसले तरी कांदा बटाटा व फळांचे सौदे नियमित झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांनी दिली.
‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून व सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या दृष्टीने अडत्यांनीच पुढाकार घेत सौदे काढणार नसल्याचे सांगितले. या बाबतचा निरोप शेतकऱ्यांना मंगळवारीच गेल्याने बुधवारी (ता. १५) व गुरुवारी (ता. १६) होणारी भाजीपाल्याची आवक झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याच्या सौद्यावेळी जादा गर्दी होत नसल्याने सोशन डिस्टन्सिंग राखले जात नव्हते.
अतिरिक्त गर्दीमुळे रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजीपाला अडत्यांनी सौदे काढणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे भाजीपाल्याचे सौदे होऊ शकले नाहीत. याचाच परिणाम म्हणून ज्या शेतकऱ्यांनी लहान वाहनातून भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. त्या शेतकऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी जाऊन भाजीपाला विक्री केली.
दरम्यान कांदा बटाटा व फळांचे सौदे मात्र नियमित झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. शुक्रवार (ता. १६) भाजीपाला बाजारास सुट्टी असल्याने शनिवार (ता. १७) पासून सौदे नियमित सुरू होतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.