जळगाव : ‘कोरोना’ला थोपविण्यासाठी अत्यावश्यक सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासंबंधी खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये किरकोळ विक्रेते, खरेदीदारांना टोकनचे बंधन केले आहे. तरीदेखील बाजारात गर्दी होत असून, बाजार विस्कळीत आहे.
गर्दीच्या मुद्यावरून जळगाव, अमळनेर, धुळे या प्रमुख बाजार समित्यांमधील भाजी मार्केट यार्ड या महिन्यात दोनदा बंद झाले आहेत. हे बाजार रविवार (ता.१२) ते मंगळवार (ता.१४) बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्री करताना अडचणी आल्या. टोमॅटो, कलिंगड, कारली, गिलके, भेंडी, गवार उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी (ता.१५) बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याचे लिलाव सुरू झाले. परंतु, हे बाजार सुरू करताना खरेदीदार, किरकोळ विक्रेते यांना प्रवेशपत्र द्यावे, गर्दी टाळावी, सामाजिक अंतर राखले जावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
हे प्रवेशपत्र घेण्यासाठी बुधवारी जळगाव बाजार समितीमध्ये एवढी गर्दी झाली की, सामाजिक अंतर राखण्याच्या सूचनांचे पालनच झाले नाही. अनेकांनी मास्कचा उपयोग न करताच रांगा लावल्या. यावरूनही बाजार समिती प्रशासनाची जिल्हा प्रशासनाने कानउघाडणी केली. गुरुवारी बाजार सुरू झाला, परंतु गर्दी झाली. भाजीपाल्याची आवक मध्यंतरी तीन दिवस लिलाव बंद असल्याने अधिकची झाली. परिणामी, टोमॅटो, कांदा, भेंडी, कारली, वांगी, गिलके, गवार, काकडी, पालक, कलिंगड उत्पादकांना अपेक्षित दर मिळाले नाहीत.
टोमॅटोचे दर तर पाच ते सहा रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. काही उत्पादकांचा काढणी, वाहतूक खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बाजार कधी सुरू, तर कधी बंद, सामाजिक अंतर राखण्याचा मुद्दा, प्रचंड उष्णता, मजूरटंचाई अशा समस्यांमुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाला पिकावर नांगर फिरविला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.