उन्हाळ्यात भाजीपाला लागवड घटणार

देशातील जलाशयांतील पाणीसाठा कमी असल्याने पिकांना पाणी उपलब्ध होईल, असे क्षेत्र खूपच कमी आहे. त्यातच तापमान वाढल्यास उन्हाळी पिकांना जास्त पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे देशातील भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र कमी होईल. - के. के. सिंग, प्रमुख, कृषी हवामान, भारतीय हवामान विभाग
भाजीपाला लागवड
भाजीपाला लागवड

नवी दिल्ली ः हवामान विभागाने यंदाच्या उन्हाळ्यात तापमान जास्त राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातच परतीच्या पावसाने देशात अनेक भागांत समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यातच ऊन वाढणार असल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. परिणाम यंदाच्या उन्हाळ्यात भाजीपाला लागवड कमी होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. वर्ष २०१७-१८ (जुलै ते जून) मध्ये जवळपास १०.२ दशलक्ष हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड झाली होती. भाजीपाल्याचे उत्पादन १८०.५ दशलक्ष टनांवर गेले होते. देशात वर्षभरात उत्पादीत होणाऱ्या एकूण भाजीपाला उत्पादनापैकी किमान २५ ते ३० टक्के उत्पादन उन्हाळ्यात होते. देशात आॅक्टोबर ते डिसेंबर या काळात पाऊस सरासरीच्या ११ टक्के कमी झाला होता. जून ते फेब्रुवारीमध्ये सरीसरीपेक्षा ६३ टक्के कमी, तर मार्च महिन्यात ४६ टक्के कमी पाऊस झाला होता. परिणामी सध्या देशातील महत्त्वाच्या जलाशयांमध्ये पाणीसाठा खूपच कमी आहे.         भारतीय हवामान विभागाने अलीकडेच जून महिन्यापर्यंत देशातील बऱ्याच भागांत तापमान सररीच्या तुलनेत जास्त राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘‘यंदा परतीच्या पावसाने देशातील अनेक भागांत समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यामुळे देशातील जलाशयांतील पाणीसाठा सध्या २७ टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होईल असे क्षेत्र खूपच कमी आहे. त्यातच तापमान वाढल्यास उन्हाळी पिकांना जास्त पाण्याची गरज भासणार आहे. परंतु पाणी उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम लागवडीवर होईल. शेतकरी यंदा उन्हाळी पिके कमी प्रमाणात घेतील. त्यामुळे देशातील भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र कमी होईल,’’ असे भारतीय हवामान विभागाच्या कृषी हवामानाचे प्रमुख के. के. सिंग यांनी सांगितले.     या पिकांच्या लागवडीवर परिणाम तापमान वाढल्यास अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेणे शक्य होणार नाही. उन्हाळ्यात एप्रिल ते जून या काळात घोसाळी भाजी, दुधी भोपळा, कोबी, भेंडी, वांगी, काकडी आणि वाटाणा ही उन्हाळी पिके तसेच टोमॅटो, कलिंगड, खरबूज, काळी मिरी आणि बारमाही पिके घेतली जातत. बारमाही पिकांनाही फटका दक्षिणेतील राज्यांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने येथे पिकणाऱ्या नारळ आणि केळी या बारमाही पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे, असे तमिळनाडू येथील कृषी शास्त्रज्ञ, व्ही. गीतालक्ष्मी यांनी सांगितले. तसेच वाढत्या तापमानाने उत्पादित होणाऱ्या फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादकता आणि गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  कांदा, टोमॅटोवर परिणाम     तापमानात वाढ झाल्यास कांद्याची वाढ कमी होऊन टोमॅटोच्या वजन आणि ओलाव्यात घट येईल असे, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी जवळपास ७० टक्के उत्पादन हे उन्हाळी कांदा पिकातून होते. हा उन्हाळी कांदा सध्या वाढीच्या अवस्थेत असून, एप्रिल महिन्याच्या शेवटी कांदा काढण्यास सुरवात होते. शेतकऱ्यांचा खर्च वाढणार पाणीटंचाई आणि दिवसाचे जास्त तापमान यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळी पिकांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. साधारणपणे शेतकरी आपल्या पिकांना दहा दिवसांतून एकदा पाणी देतात. परंतु तापमानात वाढ झाल्यास ओलावा लगेच जात असल्याने शेतकऱ्यांना पिकांना ६ ते ७ दिवसांतून पाणी द्यावे लागेल. तसेच उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी इतरही उपाययोजना कराव्या लागतील. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. शेतकरी तुषार सिंचनाने साधारणपणे पिकांना ३० मिनिटांपर्यंत पाणी देतात. मात्र आता त्यांना ५० ते ६०मिनिटांपर्यंत पाणी द्यावे लागेल. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढल्यास भाजीपाल्याच्या किमतीही वाढतील.   या राज्यांमध्ये बसणार फटका पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाना, छत्तीगड आणि झारखंड ही महत्त्वाची भाजीपाला उत्पादक राज्ये आहेत. गुजरातमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी राज्य सरकारने शेतीसाठी पाणी देणे बंद केले आहे. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्येही कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने भाजीपाला लावगवडीवर  परिणाम होऊ शकतो.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com