नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील विदर्भाचे वजन घटले आहे. कॅबिनेटमध्ये आता सातपैकी पाचच मंत्री विदर्भातील शिल्लक राहिले आहे. वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेस टाळाटाळ केली जात असून, वैदर्भीयांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने देशमुख यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा त्यांची भक्कम पाठराखण केली. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप, या दरम्यान अनिल देशमुख होम क्वारंटाइन असल्याने त्यांच्यावरच बालंट टळल्याचे बोलले जात होते.
उच्च न्यायालयानेसुद्धा परमबीर सिंग यांना चांगलेच फटकारले होते. त्यामुळे देशमुख दोन दिवसांपासून चांगलेच खूष होते. हा विषय संपला असेच सर्वांना वाटत होते. या दरम्यान विरोधकांच्या आरोपातील धारही कमी झाली होते. त्यामुळे आघाडी सरकार शाबूत असेपर्यंत अनिल देशमुख यांच्या पदाला धोका नाही, असेही त्यांचे समर्थक दावे करीत होते. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देऊन देशमुखांना चांगलाच धक्का दिला. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय देशमुखांना पर्याय राहिला नाही.
याविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. यासाठी देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तसेच सीबीआय चौकशीला लागणारा वेळ लक्षात घेता अनिल देशमुख यांना किमान सहा महिने लाल दिव्याशिवाय राहावे लागणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी यापूर्वी वनमंत्री राठोड यांनी राजीनामा दिला.
राजकारणात पाय ठेवल्यापासूनच लाल दिवा अनिल देशमुख यांनी राजकारणात पाय ठेवला तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यावर लाल दिवा मिरवत होता. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. युतीच्या काळात मंत्री होते. महाविकास आघाडीच्या १५ वर्षांच्या काळात एक वर्षांचा अपवाद वगळता देशमुख सलग १४ वर्षे मंत्री होते. पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर देशमुखांना राष्ट्रवादीने गृहमंत्री करून पहिल्या रांगेत बसवले होते. मात्र अवघ्या दीड वर्षातच वादामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.