नागपूर ः संचारबंदीत मिळालेल्या शिथिलतेमुळे ग्राहकांना खरेदीस वाढीव वेळ मिळाल्याने केळीची मागणी वाढली आहे. परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचे नुकसान झाल्याने पुरवठा कमी आहे. यामुळे केळी दरात सुधारणा झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात ३०० ते ३७५ रुपये असा दर असलेल्या केळीचे व्यवहार या आठवड्यात ६०० ते ६५० रुपये क्विंटलवर पोचले आहे. १५ किलो व त्यावरील घडाकरिता हे दर मिळत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी तालुका केळीचे हब म्हणून नावारूपास आले आहे. जळगाव व अंजनगावचेच दर राज्यभरात मानले जातात. याच भागात रायपनिंग चेंबरची संख्याही यामुळे वाढीस लागली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भागात केळी होते.
अकोट व लगतच्या भागात दहा रायपनिंग चेंबर आहेत. हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या भागात होते. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे व्यापारी बागांकडेच फिरकले नसल्याने केळी उत्पादकांची चिंता वाढीस लागली होती. दरही ३०० ते ३७५ रुपयांवर पोचले होते. परंतु दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या वादळाचा नव्या केळी बागायतदारांना सर्वाधिक फटका बसला. परिणामी केळीचा पुरवठा कमी झाला तर संचारबंदीत शिथिलता मिळत ग्राहकांना खरेदीस अधिक वेळ मिळाल्याने सर्वच फळांना मागणी वाढली. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा झाली आहे.
व्यवस्थापनावर ६० हजारांचा खर्च प्रति हजारी झाडांवर ६० ते ७५ हजार रुपयांचा खर्च व्यवस्थापनावर होतो. गेल्यावर्षी जून, जुलै मध्ये नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची केळी काढणीस आली आहे. खोडवा घेणाऱ्या शेतकऱ्यांची केळी लॉकडाऊनपूर्वीच काढणीस आली होती. परिणामी या शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले. लॉकडाऊननंतर काढणीस आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले, असे शेतकरी सांगतात.
माझी स्वतःची अडीच हजार झाडे आहेत. गावातील इतर शेतकऱ्यांची मिळून ३० हजारांवर झाडे आहेत. त्यापासून उत्पादकता मिळण्यास सुरुवात झाली. वर्धा येथील व्यापारी गावातूनच याची खरेदी करतो. आता केळी दरात सुधारणा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. - प्रकाश पुप्पलवार, खैरगाव देशमुख, पांढरकवडा, जि. यवतमाळ
वादळ वाऱ्यामुळे काही बागांचे नुकसान झाले. वर्धा, हिंगणघाट, नागभीड, ब्रम्हपूरी, वडसा, सिंदेवाही, नवरगाव या भागातून केळीला मागणी राहते. सध्या रोजची आवक आणि बाजारात पुरवठा ५ ते ६ टनाचा आहे. पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने सध्या दरात तेजी आली आहे. गेल्या आठवड्यातील ३५० ते ३७५ रुपये क्विंटलवरुन आता दर ६०० ते ६५० रुपयांवर पोचले आहेत. उन्हाळ्यात दर १४०० रुपये क्विंटल राहतात. - बालू दंडारे, संचालक, दंडारे रायपनींग, सेलू, वर्धा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.