विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब 

संततधार तसेच काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. भिवापूर तालुक्यात २४ तासांत १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब  In Vidarbha, soybean sprouts
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब  In Vidarbha, soybean sprouts

नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. भिवापूर तालुक्यात २४ तासांत १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत कापसाची बोंडसड मोठ्या प्रमाणावर झाली आहे.  नागपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. सोयाबीनला इतर पिकांच्या तुलनेत मिळणारा वाढीव दर हे त्यामागील कारण सांगितले जाते. या वर्षी सुमारे ९२ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. वातावरणदेखील पोषक मिळाल्याने या वर्षी सोयाबीनचे बंपर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र गेल्या पंधरवड्यापासून विदर्भात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी (ता. २०) मध्यरात्री तर पावसाने कहरच केला. मध्यरात्रीपासून मंगळवारपर्यंत २४ तासांत १२४ मिलिमीटर पाऊस धो-धो कोसळला. अनेक गावांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरले. तीन फुटांपर्यंत पाणी साचून होते. शेतशिवाराची परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नव्हती. चिखलापार गावात पावसामुळे सोयाबीन पाण्यात राहिले परिणामी काळवंडले आहे.  ऐन काढणीच्यावेळी हा आघात झाल्याने काही शेतकऱ्यांना काहीच उत्पादन होणार नाही अशी भीती आहे. त्यासोबतच पीक काळवंडल्याने त्याला अपेक्षित दर मिळणार नाही, अशी स्थिती आहे. अकोला, यवतमाळ जिल्ह्यात देखील कापसाचे पीक पाण्याखाली आल्याने बुरशीजन्य रोग वाढून बोंडसडचा प्रादुर्भाव झाला आहे. 

पावसात बुडाले पीक  नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये देखील संततधार पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. या सर्व जिल्ह्यांत पीक काढणीस आले असताना पावसाने पुन्हा पावसाने दगा दिल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. काही भागांत पावसामुळे शेतात काढणीसाठी जाणेदेखील शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  कापसाची बोंडसड  वर्धा जिल्ह्यात कापसाची बोंडसड झाली आहे. कापसाचे पीक सतत पावसात राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणावर बोंडसड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. कापूस उत्पादक गेल्या वर्षीच्या हंगामात बोंडआळीमुळे जेरीस आले होते. बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक काढून टाकावे लागले होते. यावर्षी काही भागात बोंडआळी सोबतच बोंडसडचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी कापसाचे उत्पादकता प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्धा जिल्ह्यात सुमारे दोन लाख १२ हजार हेक्टरवर कापसाची लागवड आहे. त्यासोबतच एक लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. हे पीक काढणीच्या अवस्थेत असताना पावसाने पिच्छा पुरविला आहे. परिणामी, सोयाबीन काळवंडले असून काही भागांत सोयाबीनला कोंब फुटले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात नुकसान अधिक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी देखील पावसामुळे झालेल्या नुकसानीची बाब गांभीर्याने घेत शुक्रवारी (ता. २४) प्रशासनाची आढावा बैठक बोलविली आहे. याच बैठकीत जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सर्वेक्षणानंतर कळणार नुकसानीची आकडेवारी  अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे १४ लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड आहे. त्यासोबतच दहा लाख १६ हजार हेक्‍टरवर कापूस असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी दिली. या जिल्ह्यांमधील नुकसानीबाबत सर्वेक्षण आणि पंचनाम्या नंतरच सांगता येईल, असे ते म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com