‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र

विखे यांचे पत्र
विखे यांचे पत्र

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण विभागात हैदोस घालणाऱ्या सोनेरी टोळीची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून सखोल चौकशी करावी, असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी सचिवांना दिले आहे.     गुण नियंत्रण विभागातील गैरव्यवहारांच्या विरोधात खासदार राजू शेट्टी यांनी एक आठवड्यापूर्वीच कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आता विरोधी पक्षनेत्यांकडूनदेखील चौकशीची मागणी झाल्याने अधिकाऱ्यांची धावपळ अजून वाढली आहे. दुसऱ्या बाजूला कॉँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुख्य सचिवांच्या कार्यालयात अजून एक पत्र दिले आहे. त्यांनी गुण नियंत्रणमधील टोळीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. श्री. मुंडे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी श्री. विखे यांनाही पत्र दिले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्यामुळे कारवाई टाळण्यासाठी आता गुण नियंत्रण विभागाला मंत्रालयातून मिळणारे राजकीय पाठबळ अजून वाढवावे लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

श्री. विखेपाटील यांच्या कार्यालयातून कृषी सचिवांना पाठविलेल्या पत्रात “कृषी आयुक्तालयाला ‘भेट’ दिल्याशिवाय राज्यातील कृषी निविष्ठा उद्योजक व कंपन्यांना परवाने मंजूर केले जात नाहीत,” असे नमूद करण्यात आले आहे.  “खते, बियाणे, कीटकनाशकांच्या बाजारपेठेत हजारो कोटींची उलाढाल होते. त्यासाठी शेकडो कंपन्या, डीलर्स, विक्रेत्यांना कृषी विभागाचे परवाने घ्यावे लागतात. मात्र, ‘ऑनलाइन परवाना’ असे फक्त म्हटले जाते. प्रत्यक्षात आयुक्तालयात ‘भेट’ दिल्याशिवाय परवाना मंजूर केला जात नाही. ‘ऑफलाइन’ कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी संकेतस्थळात जाणूनबुजून घोळ केला जातो,” असे पत्रात म्हटले आहे.  अप्रमाणित नमुन्यांचा धाक दाखवून उद्योजकांना जाळ्यात अडकवून भ्रष्टाचार केला जात असल्याचे स्पष्ट करीत या पत्रात गुण नियंत्रण विभागाचे वाभाडे काढण्यात आले आहेत. “तपासणीच्या नावाखाली निविष्ठांचे अहवाल ‘मॅनेज’ केले जातात. प्रयोगशाळांचे काम नियमाप्रमाणे होत नाही. खते, बियाणे, कीटकनाशके उत्पादक कंपन्यांना ‘प्रेझेंटेशन’च्या नावाखाली धमकावून हतबल केले जाते,’’ असेही पत्रात म्हटले आहे.  ‘‘गुण नियंत्रण विभागातील घोटाळ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे विभाग किंवा विशेष दक्षता पथकामार्फत चौकशी करावी,’’ अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. “श्री. विखेपाटील यांनी या सर्व मुद्द्यांबाबत चौकशीचा तसेच कारवाईचा अहवाल कृषी सचिवांकडे मागितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करू,” असे विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.   आयुक्तांच्या हाती अधिकाऱ्यांचे भवितव्य   “कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून राज्य शासनाला जाणाऱ्या अहवालावर आता गुणनियंत्रण विभागातील ‘अवगुणी’ अधिकाऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहील,” असेही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुण नियंत्रण विभागातील घोटाळ्याबाबत खासदार शेट्टी यांनी दिलेल्या पत्राला शासनाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही, त्यामुळे मुळात या प्रकरणाची चौकशी सुरू आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही, असे आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com