प्रत्येक क्रांतीचा उदय साताऱ्यातून ः विनायकराव पाटील

किसन वीर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार विनायकराव पाटील यांना प्रतापराव भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
किसन वीर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार विनायकराव पाटील यांना प्रतापराव भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सातारा: देश पातळीवर ज्या क्रांती झाल्या आहेत, त्यांचा उदय सातारा जिल्ह्यातून झाला असून, त्यात किसनवीर अग्रस्थानी असायचे. त्या आंबाच्या नावाचा पुरस्कार आज मिळाल्याने भरून पावलो, असे भावोद्गगार वनाधिपती व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी काढले. देशभक्त आबासाहेब वीर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विनायक पाटील यांना ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते सह्याद्री फार्मस प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, डॉ. नलिमा भोसले. अॅड. जयवंतराव केंजळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव आदी उपस्थित होते.  श्री. पाटील पुढे म्हणाले, सामाजिक, राजकीय चळवळीचा प्रयोगशाळा सातारा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही चळवळीवर सातारच्या तपासणीचा शिक्का लागतो. अशा सातारा जिल्ह्यात खूप मोठी माणसे निर्माण झाली. याच भूमितील यशवंतराव चव्हाण हे माझे आराध्य दैवत, तर आबासाहेब वीर हे मार्गदर्शक होते. सातारा जिल्ह्याने शेतकरी चळवळीत पुढाकार घेऊन त्याला मूर्त स्वरूप येईपर्यंत माघार घेऊ नये, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  उल्हास पवार म्हणाले, की देशाला स्वांतत्र्य मिळावे, यासाठी अनेकांनी आयुष्याचा होम केला आहे. पण  सध्याच्या काळात राजकीय मतभेदांना द्वेषाचे स्वरूप प्राप्त होत आहे. सध्याच्या तरुणांना विनायक पाटील व विलासराव शिंदे यांचे काम प्ररेणादायी आहेत. विलासराव शिंदे म्हणाले, की गॅट करारानंतर आपण जागतिक बाजारपेठाचा हिस्सा झाल्याने चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या प्रश्नावर स्वतः मार्ग काढावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी राजकारण तसेच जात-धर्म बाजूला ठेवून व्यावसायिक शेती केली पाहिजे.  प्रस्ताविकात मदन भोसले म्हणाले, की विनायकदादांनी ३० वर्षांपूर्वी जेट्राफा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी शेतीला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. राजकारण, समाजकारण, कला, साहित्य असा सर्वस्पर्शी त्यांचा वावर आश्चर्यचकित करणारा आहे.   कार्यक्रमात अपघातात मृत पावलेले सभासद जयसिंग साबळे व कर्मचारी सचिन शिंदे यांच्या कुटुंबीयांना विमा धनादेश प्रदान करण्यात आले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. प्रताप यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com