जळगाव : जिल्ह्यात गेल्या रब्बी हंगामात जळगाव, जामनेर, यावल, चोपडा भागात वादळ, गारपीट, यामुळे केळी, मका, गहू, बाजरी, कलिंगड व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव, धरणगाव भागात पाहणी केली.
प्रसारमाध्यमांमध्ये त्यासंबंधी छायाचित्रे, वृत्त प्रसिद्ध झाले. नवा रब्बी हंगाम सुरू होण्याची वेळ आली, परंतु, मागील रब्बीतील नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाबाबत संताप आहे.
मार्चमध्ये ही गारपीट झाली होती. ती चोपडा, जळगाव तालुक्यात अधिक झाली. तर, यावल, जामनेर व धरणगाव भागातही काही मंडळांमध्ये वादळी पाऊस झाला होता. जळगाव तालुक्यात किनोद, कठोरा, सावखेडा खुर्द, चोपडामधील गोरगावले, सनपुले, गरताड, खेडीभोकरी, माचला या भागात केळी, मका, बाजरी, गहू, भाजीपाला व फळ पिकांचे १०० टक्के नुकसान झाले होते. जळगाव तालुक्यातील कानळदा व लगतच्या गावांमध्येही मोठे नुकसान झाले होते. या भागात ५० ते ७० टक्के नुकसान झाले.
दरम्यान, पाटील यांनी जळगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमध्ये पाहणी करून भरपाईबाबत आश्वासन दिले होते. पंचनामे झाले. यात केळी व इतर सर्व पिकांचे पंचनामे झाले. परंतु, भरपाई मात्र अद्यापही मिळालेली नाही. कृषी सहायक गावोगावी सध्या जात नाहीत. तर, तलाठीदेखील फिरकत नाहीत.
शेतकरी या भरपाई, पंचनाम्यांची विचारणा करतात. पण, त्यांना उत्तर कुणी देत नाही. लोकप्रतिनिधी कोरोनाचे कारण सांगून शासन अडचणीत असल्याचे सांगते. केळी, मका उत्पादकांमध्ये यामुळे संताप वाढला आहे. सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवर जळगाव, चोपडा व इतर भागात अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.