लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच; तातडीच्या ३० लाख कुपींची मागणी

लाळ्या खुरकूतच्या लागणीच्या घटना समोर येऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत ३० लाख कुपींची तातडीची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविली आहे.
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच; तातडीच्या ३० लाख कुपींची मागणी
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच; तातडीच्या ३० लाख कुपींची मागणी

पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन कोटी पशुधनाचे लाळ्या खुरकूतच्या लसीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे लाळ्या खुरकूतच्या लागणीच्या घटना समोर येऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत ३० लाख कुपींची तातडीची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविली आहे. या मागणीचा पुरवठा मंगळवारी (ता. १४) होण्याची शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत लसीच्या कुपी उपलब्ध झाल्या किंवा नाही याबाबत पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नाही.  या लसी प्राधान्याने नगर, पुणे आणि बीड जिल्ह्यांसाठी वापरण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी लाळ्या खुरकूतची लागण होऊ नये यासाठी पशुधनाचे लसीकरण केले जाते. मात्र, यावर्षी लसीकरणाचा हंगाम संपत आला तरी लसींचा पुरवठा झालेला नाही. केंद्र सरकारकडून लसींच्या चाचण्या सुरू असून, चाचण्या झाल्यानंतर पुरवठा केला जाईल, असे केंद्राकडून वारंवार सांगण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.  राज्यात गाय, बैल आणि शेळी मेंढ्यांची सुमारे २ कोटी संख्या आहे. या पशुधनाला वर्षभरात दोनवेळा लसीकरण केले जाते. नियोजनानुसार मे अखेर लस उपलब्ध होणे गरजेचे होते. मात्र, सप्टेंबरचा निम्मा महिना गेला तरी अद्याप केंद्र सरकारकडून अद्याप लसींचा पुरवठा झालेला नाही. देशपातळीवर विविध राज्यांना ३० कोटी लसींचा पुरवठा केला जातो. यामधील महाराष्ट्राला २ कोटी ९ लाख लसींची गरज असते. दोन लसीकरणांमध्ये सहा महिन्यांचे अंतर असते. एकदा लस दिली की, साधारण ९ महिने पशुधनांमध्ये प्रतिकार क्षमता तयार होते. पावसाळ्यापूर्वी लसीकरण होणे गरजेचे असताना, सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप लसींचा पुरवठा झाला नसल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयातून सांगण्यात आले.  दरम्यान पशुधन जर लाळ्या खुरकूतच्या लागणीनंतर तापाने फणफणले तर त्याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर पुढील सात आठ महिने राहतो. या आजारपणामुळे पशुधनाकडून दूध पण कमी दिले जाते. परिणामी पशुपालक शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे.    पुरवठ्याबाबत साशंकता दरम्यान, ऐन पावसाळ्यात लस न मिळाल्यास पशुधन तापाने आजारी पडण्याचा धोका असतो. लाळ्या खुरकूतची लागण झाल्याच्या घटना नगर, पुणे आणि बीड जिल्ह्यात झाल्याने पशुसंवर्धन विभाग खडबडून झाला असून, आपत्कालीन परिस्थितीत ३० लाख कुपींची तातडीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीनुसार मंगळवारी (ता. १४) लसींचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ती उपलब्ध झाल्याबाबतची ठोस माहिती पशुसंवर्धन विभागाकडून मिळाली नसल्याने साशंकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com