अकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली आहे. अशा स्थितीतही काही नागरिक खुलेआम रस्त्यांवर फिरताना दिसतात. वारंवार विनवण्या करूनही फारसा फरक होत नसल्याने आता गावकरी वेगवेगळ्या शक्कल लढवू लागले आहेत. गुरुवारी (ता. दोन) जिल्ह्यांतील दहिगाव गावंडे ग्रामपंचायतीने लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या गावकऱ्यांची थेट पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळत गांधीगिरी केली.
दहिगाव गावंडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि तंटा मुक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी या अनोख्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. राज्यात ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु तरीही याचे उल्लंघन करीत काही जण घरांबाहेर पडत आहेत. काम नसताना विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची गर्दी होत आहे. यावर दहिगाव गावंडे येथील काही सुजाण गावकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली.
बाहेर पडून गर्दी करणाऱ्या नागरिकांची थेट आरती ओवाळून घरात राहण्याचा सल्ला देत अनोखी गांधीगिरी केली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ओट्यावर पारावर बसू नये यासाठीआरती ओवाळली व बाहेर न पडण्याचे आवाहनही केले. या अनोख्या गांधीगिरीमुळे नागरिकांनी घरी काढता पाय घेतला. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय गावंडे, ग्रामपंचायत कर्मचारी विनायक गावंडे, बाबूराव गावंडे, ॲड. जयेश गावंडे, सचिन बडोदे, उमेश गावंडे आदिंनी पुढाकार घेतला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.