परतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील पिकांसाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यात गुरुवारी (ता.३) सकाळी पाणी सोडण्यात आले. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
निम्न दुधना प्रकल्प चार वर्षांनंतर पहिल्यांदा १०० टक्के भरला. यामुळे पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन केले. त्यानुसार पहिली पाळी गुरुवारी सुरू केली. त्यानुसार प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यात २१ क्यूसेकने पाणी सोडले आहे. हे पाणी १४ दिवस सुरू राहील. सप्टेंबर, ऑटोबार महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू पीक घेतले आहे.
निम्न दुधना प्रकल्पात यंदा १०० टक्के पाणीसाठा आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दोन्ही कालव्यांद्वारे जानेवारी, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उरलेल्या दोन पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन आहे. यावर भाजप व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला. मागणी नसताना पाणी का सोडण्यात आले? अस प्रश्न उपस्थित केला आहे.
दुधना प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांना कालव्याद्वारे पाणी मिळाले, तरी ग्रामीण भागात विजेची समस्या आहे. सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.
निम्न दुधना प्रकल्पात परतूर व मंठा तालुक्यातील २१ गावांच्या हजारो एकर जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. गुरुवारी (ता.३) प्रकल्पातील डाव्या व उजव्या कालव्यात मागणी नसताना पाणी सोडण्यात आले. हा अन्याय आहे. तो आम्ही सहन करणार नाही. जे पाणी सोडण्यात आले, ते पूर्ण पणे वाया जाईल. याविरुद्ध आंदोलन करण्यात येईल. - वंदा मुझमुले, पंचायत समिती सदस्या, आंबा सर्कल.
परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. गरज नसताना प्रशासनाने प्रकल्पातून पाणी सोडले असेल, तर मनसेतर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल. - प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष, मनसे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.