पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे

दहा वर्षांपूर्वी या भागात भूकंप झाल्याने आजही परिसरात भीतीचे वातावरण आहे. चालू वर्षी उन्हाळ्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी लहान छेद गेले आहेत, त्या ठिकाणी खडकावर बुडबुडे येत आहेत. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क आहेत. प्रशासनाने वेळेत कार्यवाही करावी. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी. - नरहरी झिरवाळ, आमदार, दिंडोरी - पेठ
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे

नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घटक बाहेर येत असल्याने पाण्यावर बुडबुडे येताना स्पष्टपणे दिसत असल्याने एकीकडे कुतूहल, तर दुसरीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूगर्भात काहीतरी हालचाली सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येते. त्यामुळे जमिनीतून निघणारे पाण्याचे बुडबुडे नेमके काय आहेत, हा प्रश्न उभा राहिला आहे. 

निरगुडे गावाच्या उत्तरेला तलाव परिसरातील खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येत असून, त्यांचा आवाजही होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे, हे तपासणीअंती समोर येईल. याबाबत आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार हरीश भामरे यांनी निरगुडे येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात मेरी येथील भूगर्भअभ्यासक विभागाला कळविण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरांत यापूर्वी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. तसेच या गावापासून जवळ असलेल्या आमदा डोहाला १० वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसल्याने एक ते दीड फूट रुंद तडे गेल्याने पाण्याचा प्रवाह थांबला होता. मागील वर्षांपासून या ठिकाणी पाणी साचलेले आहे. त्यामुळे गावातील स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

ऐन पावसाळ्यात खडकाळ भागातून पाण्याचे बुडबुडे निघत असून, त्यामधून गॅससारखा घटक बाहेर पडत आहे. त्यामुळे नागरिक घाबरलेले असून, प्रशासनाने भूगर्भशास्त्र विभागाकडून हा नेमका काय प्रकार आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी निरगुडे (ता. पेठ) येथील रहिवासी मंगेश खंबाईत यांनी केली.

या प्रकारासंदर्भात ‘मेरी’च्या संबंधित विभागाला कळविले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, असे आवाहन पेठचे तहसीलदार हरिश भामरे यांनी केले.

प्राथमिक पाहणीत जास्त खोलवर परिणाम दिसत नाहीत. दीर्घ कालावधीनंतरचा पाऊस,पुनर्भरण प्रक्रिया, एप्रिल महिन्यातील भूकंपाचे धक्के कारण असू शकतात. यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे, असे भूजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक जीवन बेडवाल यांनी सांगितले.                                                                         

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com