जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत पाणी परिषद

भांडवली गुंतवणुकीच्या पिकांमुळे दुष्काळ वाढला. त्यामुळे पीक पद्धतीत बदलाविषयी विचार करावाच लागेल. - उदय देवळाणकार, सचिव, राज्य कृषिमूल्य आयोग
जल परिषद
जल परिषद

औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जलसमस्येवर उपाय शोधण्यासाठी औरंगाबाद येथे शनिवारपासून (ता. २४) पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. चार चर्चासत्रात जलसमस्येच्या अनुषंगाने काम करणाऱ्या विचारवंतांनी समस्येच्या उपायांच्या अनुषंगाने मांडणी केली. रविवारी (ता. २५) या परिषदेचा समारोप होणार आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसांच्या या परिषदेच्या उद्घाटनाला डॉ. सिंघल यांच्यासह बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, कृषिरत्न विजय अण्णा बोराडे, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उदय देवळाणकर, क्रेडाईचे विजय केडीया, उगमचे जयाजी पाईकराव, राजेश फड, अंकुशराव कदम आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक मधुकरअण्णा वैद्य यांनी केले. उपस्थितांनी आपले विचार मांडल्यानंतर परिषदेला सुरुवात झाली. पहिल्या चर्चासत्रात कृषी व सिंचन यासाठी पाण्याचा वापर, घरगुती पाण्याचा वापर व कमी पाण्यात शेती या विषयावरील चर्चासत्रात विजयअण्णा बोराडे, उदय देवळानकर, राजेश फड, जयाजी पाईकराव, विजय केडीया यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या सत्रात वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन व भूजल पातळी या विषयावर अशोक तेजनकर, संतोष जोशी, डॉ. दत्ता देशकर, दिलीप यार्दी, शिवानंद टाकसाळे आदींनी सहभाग नोंदविला. शनिवारी सायंकाळी होणारे दोन चर्चासत्र व रविवारी होणाऱ्या व्याखानानंतर परिषदेचा समारोप होणार आहे. या परिषदेतून पुढे आलेले विषय राज्य शासनाकडे पाठविले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. प्रतिक्रिया नद्यांना पाझर फुटण्यासाठी माणसांच्या हृदयाला पाझर फुटायला हवा. नद्यांची अवस्था आपण अशी का केली हा प्रश्न घेऊन लोकांकडे जावे लागेल. - जयाजीराव पाईकराव, उगम संस्था

शेतीच्या पाण्याची व्यवस्था झाली तरच उद्योग व शहरांच्या पाण्याची व्यवस्था होईल. त्यासाठी आकाशातून पडणारे पाणी भूगर्भात साठविण्याशिवाय पर्याय नाही. - विजय केडीया, क्रेडाई

मोठ्या प्रकल्पाचं पाणी शेतीला मिळणार नाही ही खूणगाठ बांधा. जलसाक्षरता नेमकी कुणाला शिकवायची हा प्रश्न आहे. फक्त ऊस पिकाला नाव ठेवून चालणार नाही. - विजयअण्णा बोराडे, कृषिरत्न

माहिती नसलेल्या विषयावर बोलण्यापेक्षा पाणी विषयावर बोलावं. आजकाल अडाणी या शब्दाचा अर्थ लोकांनी बदलून टाकला. - अरविंद जगताप, लेखक

शेतीसाठी पाण्याचा स्रोत भूजलातील पाणी सरासरीइतका व त्यापेक्षा जास्त पाणी पडूनही निर्माण होणारी टंचाई पाहता भूस्तराचा विचार करावा लागेल. भूजल क्षेत्रात फक्त सर्वेक्षण न करता संशोधन करावे लागेल. - अशोक तेजनकर , माजी प्र. कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ

पाणी प्रत्येक सजीवाशी निगडित आहे. पर्यावरण समतोल राखून पाण्याचा विचार करावा. त्यासाठी सृष्टीतील प्रत्येक सजीवाच्या पाण्याचा विचार करावा लागेल. पाण्याची गुणवत्ता, पाण्याचा पुनर्वापर, पाण्याची उत्पादकता या तीन विषयांवर काम व्हावे. त्यासाठी केंद्रबिंदू नेमका कोणता ते ठरवून काम  व्हावे. - डॉ. दत्ता देशकर, जल अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com