जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात सातत्याचा पाणी परिषदेत संकल्प

गोदावरी खोऱ्यात इतर खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जलयुक्‍त शिवार योजनेच्या कामाचा उपयोग झाला. पाणीच पडलं नसल्यानं काही भागांत परिणाम दिसत नाहीत. शेतीला पाणी मिळालं तर हाताला काम मिळेल म्हणून ''प्रत्येक शेताला पाणी व हाताला काम'' ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. - हरिभाऊ बागडे, विधानसभा, अध्यक्ष
जल परिषद
जल परिषद

औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या जलसमस्येवर विविध माध्यम व मार्गातून सुरू असलेले प्रयत्न सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प पाणी परिषदेत करण्यात आला. विविध सेवाभावी संस्था व तज्ज्ञांनी केलेल्या सादरीकणातून समोर आलेल्या उपायांवर मंथन करून त्याविषयीचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे रविवारी (ता. २५) दोनदिवसीय परिषदेचा समारोप करताना स्पष्ट करण्यात आले.   जलसंवर्धन, वृक्षलागवड, भूगर्भातील पाणी, कृषी व सिंचनासाठी पाण्याचा उपयोग, सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे पाण्याविषयी कार्य, शासकीय योजना-जलयुक्‍त शिवार, शेततळे सौरऊर्जा यांसह महाराष्ट्रातील जलसमस्यांचा आढावा व त्यावर उपाय शोधण्यासाठी औरंगाबाद येथील एमजीएम कॅम्पसमधील रूख्मीणी हॉलमध्ये शनिवारपासून (ता. २४) दोनदिवसीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या परिषदेत दोन दिवसांत जवळपास २९ तज्ज्ञांनी आपले जलसमस्येवरील उपायांविषयी केलेले कार्य व करता येऊ शकणाऱ्या उपायांची जंत्री मांडली. रविवारी परिषदेच्या समारोप सत्रापूर्वी चित्रफितीसह प्रत्यक्ष व्याख्यानातून अनुभवी तज्ज्ञांनी आपल्या विचारांची मांडणी केली. डॉ. शैलेंद्र वानखेडे यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या चित्रफितीच्या सादरीकरणाने दुसऱ्या दिवशी परिषदेला सुरवात झाली. त्यानंतर पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे यांनी त्यांचे अनुभव सांगितले. जलवर्धिनी प्रतिष्ठानचे डॉ. उल्हास परांजपे यांनी पाणी साठवणुकीच्या अत्यल्प व सहज करता येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. नगरचे अविनाश आव्हाड यांनी मजले चिंचोली या गावातील जलचळवळीचे फायदे मांडले. हेमंत बेलसरे या आयआयटीच्या विद्यार्थ्याने पाण्याच्या ताळेबंदाची मांडणी केली. गोविंद फड यांच्या छतावरील पाण्यातून बोअरवेल पुनर्भरणाची चित्रफीत दाखविण्यात आली.  माजी आयुक्‍त भास्कर मुंडे यांनी दुष्काळाच्या संकटात धुळे जिल्ह्यात तेरा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून गिरणा व बोरी नदी, मोसम व कनोली नदी जोडून चार धरण लोकसहभाग व उपलब्ध साधनांचा वापर करून कशी भरली याचे सादरीकरण केले. नामच्या शुभा महाजन यांनी जलसंधारणाच्या कामाचा फाउंडेशनचा लेखाजोखा मांडला. कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे प्रा. पंडित वासरे यांनी पावसाचे प्रमाण, त्याची अनियमितता, कडवंचीरूपात उपायांचे समोर आलेले परिणाम, जलसमस्येवरील उपायांवर भूशास्त्राचा अभ्यास व पाण्याच्या ताळेबंदाची गरज आदीचे सादरीकरण केले. प्रशांत परदेशी यांनी रेन्बो फाउंडेशनचे कार्य मांडले. जलसंपदा विभागाचे उपअभियंता अरूण घाटे यांनी गोदावरी खोऱ्या वैतरणेचे पाणी वळविण्याच्या संधीची मांडणी केली. शीतल गायकवाड यांनी आदर्श गाव संकल्पनेंतर्गत कार्यालयासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज व्यक्‍त केली. समारोपीय सत्राला माजी आयुक्‍त भास्कर मुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्र सिंगल, कृषिरत्न विजयअण्णा बोराडे, उद्योजक मिलींद पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  परिषदेसाठी झटणाऱ्या औरंगाबाद, नगर, नाशिक जिल्ह्यांतील सर्वांचा या वेळी सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी पाणी परिषदेत सहभागी होऊन आपले विचार मांडले. शनिवारी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संदेशाद्वारे पाणी परिषदेची गरज होती. परिषदेतील जलसमस्येवरील उहापोह शासनदरबारी सादर करण्याची सूचना केली होती. परिषदेचे संचालन प्रसाद जोशी यांनी केले. स्वरविहार राजेश सरकटे यांनी पाणी व राष्ट्रप्रेम याविषयीच्या गितांनी परिषदेत उत्साह वाढविला.  प्रतिक्रिया संकटाच्या काळात लोकांशी संवाद महत्त्वाचा ठरतो. प्रशासकीय प्रयत्न, व्यवहार्य बाबी तपासल्याने लोकसहभागातून तेरा वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात दुष्काळात जलसमस्या सोडविता आली.  

- भास्कर मुंडे, माजी महसूल आयुक्‍त, औरंगाबाद.

पाणी परिषदेच्या निमित्ताने प्रत्यक्ष काम करणाऱ्या अनुभवी व्यक्‍तींनी मांडलेले विचार सृष्टीच्या उपयोगी पडतील. पाणी परिषद आयोजनाचा अनुभव स्मरणीय आहे. परिस्थीत बदलविण्याची क्षमता असणाऱ्या परिषदेतील सहभागी सर्वांनी झालेला संवाद सर्वांपर्यंत पोचवून करता येणाऱ्या कार्याचा आरंभ करावा. - डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद. 

पाणी परिषदेच्या निमित्ताने कृतिशील व्यक्‍तींचा संगम झाला. पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या कामात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असून पाण्याच्या प्रश्नाकडे महिलांनी गंभीरतेने पाहण्याची आवश्‍यकता आहे.  - विजयअण्णा बोराडे, कृषिरत्न. 

एक पिढी नऊ पिढ्याचं पाणी बरबाद करते आहे. पाणी परिषदेचे नियोजनपूर्वक आयोजन पाहता ग्रामविकास व गृहखात एकाच व्यक्‍तीकडे असलं तर हा विचार मनात आला. सरपंचाशिवाय ग्रामविकास शक्‍य नाही. ग्रामपंचायती अधिकाधिक सक्षम करणे आवश्‍यक आहे. - भास्कर पेरे, सरपंच, पाटोदा, जि. औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com