कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. या पद्धतीत उभ्या पिकात ठरावीक ओळीनंतर सरी काढणे, आच्छादनाचा वापर, पिकावर रसायनांचा फवारणी, जैविक बांध आणि बंदिस्त सरी पाडावी. कोरडवाहू शेतीत मूलस्थानी जलसंधारणासाठी उपाय करणे आवश्यक आहे. सध्या ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद पिकाची वाढ चांगली दिसून येत आहे. पुढील काळात पावसाचा खंड पडल्यास मूलस्थानी जल संधारण करणे आवश्यक आहे. सध्या पाऊस सुरू आहे. वापसा स्थितीमध्ये कोळपणी व निंदणीची कामे सुरू आहे. थोड्या कालावधीत खूप जास्त पाऊस पडल्यास पावसाचे पाणी जमिनीवरून वाहत जाऊन नदी, नाले व ओढ्यांद्वारे अपव्यय होतो. कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबविणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे पिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. या पद्धतीत उभ्या पिकांत ठरावीक ओळीनंतर सरी काढणे, आच्छादनाचा वापर, पिकावर रसायनांचा फवारणी, रुंद वरंबा-सरी पद्धतीचा वापर, जैविक बांध, उताराला आडवी पेरणी आणि बंदिस्त सरी पाडणे यासारख्या बाबींचा कोरडवाहू शेतीत मूलस्थानी जलसंधारणासाठी उपाय करणे आवश्यक आहे. उभ्या पिकात ठरावीक ओळींनंतर सरी काढणे
खरीप हंगामातील पिकांची पेरणी झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी आंतर मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर, विविध पिकाच्या अंतरानुसार उभ्या पिकात २, ४ किंवा ६ ओळींनंतर कोळप्याच्या साह्याने किंवा बळीराम नांगराने सरी काढावी. तूर, कापूस या पिकामध्ये दोन ओळींनंतर आणि बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये ४ ते ६ ओळींनंतर सरी काढावी. या सऱ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीतील पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. त्याचा पिकाला अधिक फायदा होतो. आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन टाळता येते. आच्छादनासाठी सोयाबीन भुसा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा, हरभऱ्याचा भुसा इत्यादींचा वापर करावा. आच्छादन करताना उभ्या पिकात मशागतीची कामे झाल्यानंतर दोन ओळीत जमिनीवर समप्रमाणात पसरावे. यासाठी भुसाचे प्रमाण २.५ ते ५ टन प्रति हेक्टरी ठेवावे. आच्छादनामुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकावर रसायनाची फवारणी करणे
पावसाचा खंड कालावधी ६ ते १२ दिवसाचा झाल्यावर लगेच पोटॅशिअम नायट्रेटची २ टक्के किंवा डिएपी २ टक्के किंवा २ टक्के युरियाची फवारणी करावी. पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी केल्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी होते. पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होतात. या मुळे उत्पादनात ६ ते ८ टक्के वाढ होते. ही पद्धत भारी जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे तसेच जमिनीतील जलसंधारण करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. रिजरच्या साहाय्याने किंवा बैलचलित नांगराने सऱ्या पाडून वरंब्यावर पिकांच्या ओळींच्या गरजेप्रमाणे वरंब्याची रुंदी ठरवावी. साधारणपणे दोन ओळीतील आंतर जास्त असणाऱ्या पिकात (कापूस, तूर) दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकांच्या (सोयाबीन, मूग, उडीद) चार ओळी वरंब्यावर येतील.त्यानंतर सरी असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. कमी पाऊस झाल्यास सरी मध्ये पाणी जमिनीमध्ये मुरते. पिकांना ओलावा उपलब्ध होतो. उत्पादनामध्ये वाढ होते. उताराला आडवी पेरणी, मशागत
जमिनीला नियमित उतार असलेल्या क्षेत्रावर आडवी पेरणी करावी. अशा जमिनीवर मशागतीची सर्व कामे जसे नांगरणे, वखरणे, कोळपणी करणे तसेच पेरणी यासारखी कामे उताराला आडवी केल्याने जमिनीच्या भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. या उपायामुळे जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते. जमिनीची धूप रोखण्यास मदत होते. शेताच्या पृष्ठभागावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविण्याकरिता समपातळी जैविक बांध घालावेत. जमिनीच्या उतारानुसार उतारास आडवे खस गवताचे बांध किंवा सुबाभळीचे बांध तयार करावे. त्यामुळे पाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी जमिनीत मुरते. जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवून राहतो. जैविक बांधावर दोन फुटांवर झुडपांची लागवड करावी. झाडांची उंची दोन फुटांपर्यंत ठेवावी. ४) जैविक बांधासाठी वापरात येणाऱ्या झाडांचा पाला-पाचोळा जमिनीवर टाकला जातो तसेच हिरवा चारा म्हणूनही वापर करता येतो. दोन जैविक बांधातील अंतर १२ ते १५ मीटर ठेवावे. जैविक बांधाची रुंदी ३० सें.मी. आणि उंची ३० ते ४५ सें.मी. ठेवावी. यापेक्षा जास्त झाल्यास त्याची छाटणी करावी. संपर्क- डॉ. वा.नि.नारखेडे, ७५८८०८२१८४ (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)