गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन; विसर्ग पुन्हा सुरू

गंगापूर धरणातून सुरु असलेला विसर्ग
गंगापूर धरणातून सुरु असलेला विसर्ग

नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरणसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गंगापूर धरणातून बंद करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी गंगापूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. 

गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आला होता, मात्र दारणा, भावलीसह अन्य काही धरणांमधूनही विसर्ग सुरू होता. सध्या जिल्ह्यातील एकूण २४ धरणांपैकी १९ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने हे धरण ९४ टक्के भरले आहे. गंगापूर धरणातून १६११ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. दारणा धरणातून ४११६ क्युसेकने, तर भावलीतून २०८ क्युसेकने विसर्ग सुरू होता.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे ६ हजार ३८३ क्युसेक वेगाने विसर्ग होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. गंगापूर धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर झाल्याने या ठिकाणी प्रवेशासाठी मनाई असताना पर्यटक येथे प्रवेशासाठी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वादविवाद करतात. त्यामुळे याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण होतो. पर्यटकांकडून गैरप्रकार घडू नये म्हणून जलसंपदा विभागाने ही मनाई केली आहे. मात्र पर्यटकांचा धुमाकूळ मनस्ताप ठरत आहे. पोलिस यंत्रणेने या परिस्थितीत लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com