औरंगाबाद : मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. ६७१ गावे-वाड्यांची तहान भागविण्यासाठी ७०९ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसते आहे. या जिल्ह्यातील ३९९ गावे व ६४ वाड्या मिळून ४६३ गाव-वाड्यांना ४९० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील ६० गावे व ८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. या गाव वाड्यांना ७१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील २७ गाव-वाड्यांना पाणीटंचाई भेडसावत असून पाणीटंचाई निवारण्यासाठी २७ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील १५ गावे व ४ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून येथे ९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ४७ गावे व ३७ वाड्यांना टंचाईला सामोर जावे लागत आहे. नांदेडमध्ये टंचाई निवारण्यासाठी ९८ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ७ गावे व दोन वाड्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. बीड जिल्ह्यात ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातही पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्ह्यातील एका गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. लातूर जिल्ह्यात एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी १५४८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये ४११ विहिरींचे अधिग्रहण टॅंकरसाठी करण्यात आले आहे. टॅंकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी ११८१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पाणीटंचाईची झळ सर्वाधिक बसते आहे. गंगापूरमधील ९२ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यापाठोपाठ वैजापूर तालुक्यातील ६१ गावे व ४ वाड्या, सिल्लोड तालुक्यातील ५७ गावे व १० वाड्या, औरंगाबाद तालुक्यात ५५ गावे व २३ वाड्या, फूलंब्री तालुक्यात ४९ गावे व ५ वाड्या, पैठण तालुक्यात ३३ गावे व ३ वाड्या, खुल्ताबाद तालुक्यातील २५ गावे १४ वाड्या, कन्नड तालुक्यात २४ गावे ५ वाड्या तर सोयगाव तालुक्यातील ३ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.