कोयनानगर, जि. सातारा ः म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेसाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग उन्हाची तीव्रता वाढल्याने सध्या कमी पडत असल्यामुळे, तसेच कृष्णा नदीवरील बंधाऱ्यातील पाणी वापरामुळे साटपेवाडीखालील नागठाणे, डिग्रज, सांगली व म्हैसाळ या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी पुरेसा विसर्ग होत नसल्याने या योजनेसाठी कोयना धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी सांगली पाटबंधारे विभागाने केल्यामुळे दुष्काळी भागासाठी कोयना धरणाचा आपद्कालीन विमोचक दरवाजा साडेतीन फुटांवर उचलून त्यातून नदीपात्रात १,३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
कोयना धरणात सध्या ६१ टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा आहे. पश्चिमेकडील सिंचन प्रकल्पासाठी धरणाचा पायथा वीज गृहाचे दोन्ही युनिट सुरूच आहेत. दोन्ही युनिटच्या माध्यमातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. टेंभू, ताकारी योजनेचे १९ पंप सुरू आहेत. त्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असले, तरी उन्हाची तीव्रता वाढल्याने हा विसर्ग कमी पडत आहे.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने कृष्णा नदीमध्ये आवश्यक पाणी पातळी राखणे आवश्यक आहे. आज दुपारी साडेअकरा वाजता विमोचक आपत्कालीन दरवाजा साडेतीन फुटाने वर उचलून त्यातून नदीपात्रात १,३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. विसर्गामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.