मुंबई : ‘‘पार - तापी नर्मदा योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या हद्दीतून दिले जाणारे १५ टीएमसी पाणी गुजरातच्या उकाई धरणाच्या बॅक वॉटरमधून महाराष्ट्राच्या तापी खोऱ्यात परत मिळणे प्रस्तावित आहे. मात्र त्यास गुजरात राज्याची संमती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही’’, असा खुलासा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना केला.
पाटील म्हणाले, ‘‘गोदावरी खोऱ्यात पश्चिम वाहिनी खोऱ्यातून पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या योजनांपैकी पार-गोदावरी नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समिती यांच्याकडे तांत्रिक छाननीच्या अंतिम टप्प्यात आहे. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी नदीजोड/वळण योजनांद्वारे तापी व गोदावरी खोऱ्यात वळविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. सरकारने वळण बंधाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. बरेच बंधारे पूर्णत्वास आले आहेत. येत्या काळात या भागाला पाणी कसे देता येईल, यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे.’’
...तर पाणी वळविणे शक्य
‘‘मुंबई महापालिकेने पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प हाती घेतला नसल्याने चार टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवता येत नाही. मुंबईत महापालिकेने पुरेसे पुनर्वापर प्रकल्प उभारले नसल्याने वैतरणा धरणातील चार टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवता येत नाही. एकदा असे प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर मराठवाड्यात काही पाणी पाठवले जाईल,’’ असेही पाटील म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.