पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी करायचे असते, असा समज पसरलेला आहे. खरे तर जल व्यवस्थापनाची सर्वाधिक गरज कोरडवाहू क्षेत्रामध्ये आहे. कारण येथे संरक्षित पाणी उपलब्ध असत नाही. त्या दृष्टीने आपल्याला जे काही पाणी साठवायचे आहे, ते मातीमध्ये ही भावना शेतकऱ्यांमध्ये रुजली पाहिजे. पाण्याचा पिकांसाठी कार्यक्षम वापर करण्याच्या बाबतीत प्रतापराव चिपळूणकर, विश्वासराव पाटील आणि सुभाष शर्मा यांसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव मोलाचे आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहेत. महाराष्ट्रात एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी केवळ १७.५ टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. याचा अर्थ सुमारे ८२ टक्के शेती कोरडवाहू आहे. असे असूनही शेती सुधारणांचा विचार करताना केवळ बागायती क्षेत्राला प्राधान्य दिले जाते. कोरडवाहू शेतीची एकूण व्यावसायिक उलाढाल व मूल्य कमी असल्याने ती संशोधनाच्या पातळीवरही दुर्लक्षित राहते. कोणतीही शेती ही निसर्गावरच अवलंबून असली तरी कोरडवाहू शेतीचे मॉन्सून आणि पावसावरील अवलंबित्व अधिक धारदार ठरते. आकाशाकडे नजर लावून बसलेला शेतकरी हे केवळ प्रतीकात्मक राहत नाही. तो तुमच्या-माझ्या घरात, रानात, पारावर अवतरलेला असतो. ग्रामीण भागात कुठेही जा, गप्पांचा सूर पावसावर वळल्याशिवाय राहत नाही. आकाशाकडे बघत बघत उन्हाळ्यामध्ये मशागतीची कामे उरकून शेतकरी तयार असतो. पावसाचे चार महिने शेतकऱ्यांच्या जिवाची उलघाल सतत सुरू राहते. `आला नाही, तर कधी येणार`, `आता पडायला हवा होता` अशा वाक्यांपासून `का जिवावर उठलाय` इथपर्यंत! दुष्काळग्रस्त, कोरडवाहू गावांत ग्रामस्थांचा जीव शेतीत जितका अडकलेला असतो, तितकाच पावसात. पिकासाठी पाण्याचे नियोजन करायचे, हा विषय कोरडवाहू भागात फारसा बोलला जात नाही. जल व्यवस्थापनाचा विचार होतो तो प्रामुख्याने बागायती भागामध्ये. राज्याच्या बागायती पट्ट्यामध्ये ठिबक सिंचन चांगलेच रुजले आहे. अनेक बागायती गावांतही पावसाची वाट पाहिली जातेच. त्याशिवाय नद्या, नाले, विहिरी भरणार नाही, याची जाणीव त्यांनाही असतेच. उपलब्ध पाणी हंगामाच्या शेवटपर्यंत पुरवण्याची धडपड सुरू असते. शेततळ्यांखाली जमीन वाया जाते ही शेतकऱ्यांची सुरवातीची मानसिकता बदलून आता अनेक गावांमध्ये शेततळ्यांची स्पर्धा सुरू झाली आहे. पावसाळ्यात शेततळे भरून घेऊन फळबाग लावणारे आणि जगवणारे बहुतांश शेतकरी आपल्या आजूबाजूला दिसतात. ही शेततळ्यांची कल्पना कोरडवाहू गावांमध्ये का रुजली नाही, याचा विचार करायलाच हवा. त्यात मुळातच पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक वेळा शेततळे भरत नसल्याचा मुद्दा एका कोरडवाहू शेतकऱ्याने सांगितला. शेततळे भरून ठेवण्यासाठी नदी, नाला किंवा वाहता पाण्याचा स्रोत, एखादी विहीर किंवा बोअरवेल आवश्यक ठरतो. पावसाची अनियमितता हा विषय तर कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत अडचणीचा ठरतो. यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्र. र. चिपळूणकर म्हणाले, ‘‘पावसाचे दिवस कमी असण्याबरोबरच थोड्याच काळात जास्त पाऊस पडून गेल्यामुळे पाणी झिरपण्याऐवजी वाहून जाते. वाहून जाताना मशागत करून तयार असलेल्या शेतातील सुपीक मातीची धूपही करते. इथे शून्य मशागत किंवा कमी मशागतीची शेती उपयुक्त ठरू शकते. यातून उत्पादन खर्चात बचतही साधेल. मोठ्या कोरडवाहू पट्ट्यामध्ये कापूस आणि तूर ही पिके प्रामुख्याने आहेत. यांचे लागवड अंतर अधिक असल्याने दरम्यान मूग, उडीद यासारखी आंतरपिके घेतली जातात. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो. एक तर अपूरा पाऊस, दोन पावसातील मोठा खंड यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यांची वाढ खुंटते. वेळ उलटून गेल्यानंतर पडलेल्या पावसाने पीक वाढू लागेपर्यंत किंवा दाणे भरण्याच्या स्थितीमध्ये आल्यानंतर जमिनीतील ओलावा संपलेला असतो. या काळात पावसाची अपेक्षा असली तरी तो पडेलच याची खात्री नसते.`` कोरडवाहू शेतीतील या समस्या लक्षात घेता खालील उपाययोजना फायद्याच्या ठरतील...
तुरीसह कमी पाण्यातील फळबाग : सुभाष शर्मा
यवतमाळ येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांचेही कोरडवाहू शेती शाश्वत करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयोग सुरू आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे ः
कमी पाण्यात उसाचे नियोजन : विश्वासराव पाटील पाण्याचे व्यवस्थापन हा मुद्दा आला की ऊस हे सर्वाधिक पाणी फस्त करणारे पीक असल्याची टीका सुरू होते. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ऊस असतोच. मात्र, कोरडवाहू भागातही अनेक ठिकाणी विहिरीच्या पाण्यावर ऊस घेण्याची धडपड करणारे अनेक शेतकरी दिसतात. कमीत कमी पाण्यावर ऊस कसा घेता येईल, असा प्रश्न मी लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी विश्वासराव पाटलांना विचारला. त्यावर त्यांनी तुमची जमीन श्रीमंत आहे का, असा प्रश्न मला विचारला. पहिल्यांदा जमीन श्रीमंत केली पाहिजे अशी विश्वासरावांची आग्रही भूमिका आहे. ते म्हणाले, ‘‘मी ऊस लागवडीचे नियोजन एक वर्ष आधी करतो. ऊस घ्यावयाच्या जमिनीमध्ये मी खरिपात हिरवळीची किंवा बेवडाची पिके उदा. धैंचा, ताग, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग घेतो. धैंचा, ताग फुलावर येण्याआधी सुमारे ४५ दिवसांनंतर जमिनीत नांगराने गाडतो. तिथे गुरे, ढोरे, शेळ्यामेंढ्या यांचे आखर बसवतो. आवश्यकता वाटल्यास नदीनाल्याचा पाझर तलावाचा गाळ टाकतो. रब्बीमध्ये कोणतेही पीक न घेता जमिनीला विश्रांती देतो. ओल टिकवण्यासाठी वखर पाळ्या करून मृद आच्छादन करतो. अशा प्रकारे जमीन श्रीमंत झाल्यानंतर मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण उत्तर दिशेने अडीच ते तीन फुटावर मृत सऱ्या पाडतो. मध्ये पाच फुटाचा पट्टा सोडतो. मॉन्सूनच्या पावसानंतर वाफसा आल्यानंतर तिथे जीवामृत, घनजीवामृत टाकतो. घरच्याच उसाच्या बेण्यावर संस्कार करून, ३ डोळ्यांच्या बेण्याची लागवड करतो. त्यावर माती लोटून देतो. पुढील ८ ते १० दिवसात पाऊस पडला की नैसर्गिक ओलीवर ऊस उगवायला सुरुवात होते. मधल्या पाच फुटाच्या पट्ट्यामध्ये धैंचा, ताग, मूग, उडीद किंवा भुईमूग असे आंतरपिक घेतो. जून ते सप्टेंबर या काळात यातून उत्पादन मिळून जाते. त्यातील बायोमास दोन उसाच्या ओळीमध्ये आच्छादन करतो. त्यामुळे जमिनीतील ओल व वाफसा टिकून राहतो. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाण्याचे नियोजन करावे लागते.`` पाण्याचे नियोजन विश्वासरावांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पाणी नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ पूर्वी पाणी होते त्या वेळी १५ दिवसांच्या अंतराने उसाच्या जोडओळीला थोडेसे पाणी देत असे. त्यातही मधला पाच फुटाचा पट्टा कोरडा. नंतर जोडओळी पाणी अशा प्रकारे तीन एकर ऊस लागवड असल्यास त्यातील अर्ध्या एकर क्षेत्रालाच पाणी देत होतो. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराचे वरील प्रकारे कमी पाण्याच्या पाळ्या व त्या सोबत जीवामृत देत असे. मात्र, गेल्या २० वर्षापासून पाणी कमी झाल्याने ठिबक सिंचनावरच ऊस घेतो. यातील फिल्टरमध्ये वस्त्रगाळ करून जीवामृत टाकतो. दरम्यानच्या काळात मातीखालची ओल टिकून राहण्यासाठी निंदणाच्या गवताचे दोन ओळीमध्ये आच्छादन करतो. मधील पाच फुटाच्या पट्ट्यात १ बेलाच्या औताने हलकी वखर पाळी करून मृदा आच्छादन करतो. मार्चपासून उसाची तोडणी सुरू होते. मार्च ते जून मध्यावधीपर्यंत रसवंतीगृहांना ऊस देतो. त्यामुळे पाच ते साडेपाच हजार रुपये प्रति टन असा दर पडतो.`` खोडव्याचे नियोजन उसाची पाने व काडी-कचरा न जाळता त्याचे आच्छादन करण्यावर विश्वासरावांचा कटाक्ष आहे. पूर्वी पाणी होते, त्यावेळी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते एक पाणी देत असत. नंतर येणाऱ्या पावसाच्या ओलीवर व आच्छादनामुळे जून ते ऑक्टोबर पाणी देण्याची गरज भासत नसे. तसेच तणे उगवत नसल्यामुळे आंतरमशागत करायची गरज पडत नव्हती. जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या प्रचंड वाढत असे. या उसाला दुसरे पाणी ऑक्टोबरमध्ये, तिसरं पाणी जानेवारीमध्ये, फेब्रुवारी-मार्चमध्ये उसाची तोडणी. अलीकडे ठिबक सिंचन केल्यामुळे मातीखालील ओल बघून त्यानुसार मधून अधून ठिबकचा वापर केला जातो.
वनभिंतींचा फायदा सतत वाहत्या वाऱ्यामुळे ओल कमी होते. ती टाळण्यासाठी विश्वासरावांनी शेताच्या बांधावर पश्चिम व दक्षिणेकडे वनभिंती उभ्या केल्या आहेत. यात बांबू, लिंब, बेहडा, जांभूळ, उंबर, सीताफळ, बोर अशी झाडे जोपासलेली आहेत. त्यातून पालापाचोळ्याबरोबरच उत्पन्नही मिळते. शेतातील ओल टिकवण्यासाठी उताराला आडवी बांधबंदिस्ती, नांगरट, वखरणी, पेरणी यावर भर आहे. वरंबा-सरी पद्धतीने पिकाची लागवड केली जाते. - सतीश कुलकर्णी ९९२२४२१५४०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.